महाराष्ट्रात बेरोजगारीचा दर ३.१२ टक्क्यांवर…!


मुंबई : रखडलेली नोकरभरती, राज्याबाहेर जाणारे प्रकल्प यामुळे एकीकडे राज्यात तरुणांच्या हाताला काम नसल्याने १४ लाखांहून अधिक बेरोजगार असल्याचा अहवाल केंद्र शासनाच्या कामगार मंत्रालयाने काही महिन्यांपूर्वी दिला होता. सीएमआयईईच्या अहवालानुसार डिसेंबर-२०२२ अखेर राज्याचा बेरोजगारी दर ३.१२ टक्के होता.

 

 

एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे राज्य शासनाकडून तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी आयोजित रोजगार मेळाव्यांना होणारी गर्दी कमी होत आहे. गेल्या ३ वर्षांत अशा मेळाव्यांत तरुणांच्या संख्येत सुमारे ३२ टक्के घट झाल्याचे राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून समोर आले आहे.

 

 

राज्यात शासनाच्या विविध विभागांतील अडीच लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. आरोग्य विभागासह इतर विभागांच्या जाहीर झालेल्या नोकर भरती घोटाळ्यात अडकल्याने रखडल्या आहेत. शिवाय मोठ्या संख्येने तरुणांच्या हाताला काम देऊ शकतील असे मोठे प्रकल्पही राज्याबाहेर गेल्याने मध्यंतरीच्या काळात मोठा गदरोळ झाला होता. यावरून आरोप-प्रत्योरापांचे राजकारणही रंगले होते.

 

 

जिल्हा रोजगार मेळाव्यातून फक्त १० जणांना नोकरी
उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळावे यासाठी राज्याचा कामगार विभाग कौशल्य विकास विभागाच्या वतीने तरुणांसाठी २००९-१० पासून प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले जाते. मात्र, या मेळाव्यांना मिळणारा प्रतिसादही दिवसेंदिवस कमी होत असून गेल्या ३ वर्षांत यात ३२ टक्के घट झाली आहे. जिल्हा मेळाव्यासाठी आलेल्या एकूण तरुणांपैकी सरासरी फक्त १० जणांना नोकरी मिळत आहे.

८४ हजारांपैकी २३ हजार तरुणांना रोजगार
२०२०-२१मध्ये राज्यात १९४ रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. यात १ हजार ६९५ उद्योजकांनी सहभाग नोंदवला होता. २ लाख ६३ हजार ८३३ जणांनी या रोजगार मेळाव्याला उपस्थिती लावली. यात, २८ हजार ८१२ जणांना नोकरी मिळाली. २०२१-२२ मध्ये २०२ रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले गेले होते. यात १३४६ उद्योजकांनी सहभाग नोंदवला होता. एकूण ९३ हजार १५३ तरुणांनी उपस्थिती लावली. यातून ९ हजार ५९५ जणांना नोकरी मिळाली. २०२२-२३ या आर्थिक वर्षातील ऑक्टोबर २०२२ अखेर २२४ रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. यात १८७७ उद्योजकांनी सहभाग नोंदवला तर ८४ हजार ३१७ बेरोजगारांनी हजेरी लावली. यातील २३ हजार जणांना नोकरी मिळाली.

तरुणांची मेळाव्याकडे पाठ…
रोजगार मेळाव्यात सहभागी होणारे बहुतांश उद्योजक मुंबई, पुणे, नागपूर अशा महानगरांमधील असतात. जिल्हा पातळीवर हे मेळावे होतात. अनेक तरुणांकडे पदव्या, पदविका आहेत. मात्र प्रत्यक्ष कामाचे कौशल्य नसल्याने उमदेवारांची निवड होत नाही. ज्यांची निवड झाली त्यांना कामाचा अनुभव नसल्याचे कारण देऊन १० ते १५ हजार रुपये वेतन दिले जाते. या महागाईच्या काळात महानगरांमध्ये एवढ्या तुटपुंज्या वेतनात काम करणे शक्य नाही. त्यामुळे निवड होऊनही अनेक जण जात नाहीत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!