उद्धव ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात! आमच्याकडे या नाहीतर तुरुंगात जा अशी धमकी…

मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांत विधानभवनातच जोरदार हाणामारी झाली होती.

यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी विधानभवनात मला मारण्यासाठीच गुंड आणण्यात आले होते, असा गंभीर आरोप केला आहे. यानंतर आता माजी मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. सत्ताधाऱ्यांवर टीका करताना त्यांनी असा आरोप केला की, आमच्याकडे या नाहीतर तुरुंगात जा, अशा धमक्या देऊन गुंडांना पक्षात घेतलं जातं.
पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून सत्तेचा माज दिसत आहे. मंत्र्यांना खोके उघडताना पाहिलं आहे आणि काल तर विधानभवनाच्या आवारात थेट हाणामारी झाली. हे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणं आहे.

ते पुढे म्हणाले, गुंडांना धमकी दिली जाते की, आमच्याकडे या नाहीतर तुरुंगात जा. त्यांना पक्षात घेऊन पवित्र केलं जातं. हा गुंडांचा नवरा राजकीय जन्म आहे. हे लोकशाहीसाठी घातक आहे.

उद्धव ठाकरे यांनी सर्वच राजकीय पक्षांना याबाबत जबाबदार ठरवले. “सर्व पक्षांनी एकत्र बसून अशा गुंडांना पदांवरून दूर करण्याचा निर्णय घ्यायला हवा. विधीमंडळात जर असे प्रकार घडत असतील तर राज्याची प्रतिमा देशात कशी दिसेल?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
विधानभवन परिसरात राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते यांच्यात वाद झाला. यात आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख याला मारहाण झाली. या प्रकरणाचा व्हिडीओही समोर आला आहे. आव्हाड यांनी आरोप केला की, “मला मारण्यासाठीच गुंड आणले गेले होते असे ते म्हणाले आहे.