‘यशवंत’ मध्ये संधी दिल्यास साडेबाराशे टनी अत्याधुनिक कारखाना सुरू करु दाखवू! आण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेल प्रमुख प्रकाश जगताप यांचा विश्वास..!!

उरुळीकांचन : यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी आम्ही न्यायालयीन, राज्य सरकार माध्यमातून यापूर्वी लढा दिला असून भविष्यकाळात सभासदांनी संधी दिल्यास यशवंत कारखान्याला गतवैभव प्राप्त करुन देऊ असा विश्वास व्यक्त करुन अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीला सभासदांनी संधी द्यावी असे आवाहन आण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचे पॅनेल प्रमुख प्रकाश जगताप यांनी केले आहे.
यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत आण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीच्या पॅनेलच्या सांगता प्रचार सभेत पॅनेल प्रमुख प्रकाश जगताप हे बोलत होते. यावेळी सभेसाठी जिल्हा बॅकेचे संचालक विकास दांगट, हवेली बाजार समितीचे माजी सभापती पंढरीनाथ पठारे, प्रताप गायकवाड , माणिकराव गोते, कात्रज दूध संघाचे संचालक गोपाळ म्हस्के, पॅनेल प्रमुख बाळासाहेब चौधरी, प्रशांत काळभोर ,कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग काळे, बाजार समितीचे संचालक शशिकांत गायकवाड,नंदू काळभोर,सचिन तुपे, सागर चौधरी तसेच सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
प्रकाश जगताप म्हणाले, बाजार समिती, जिल्हा बॅक या निवडणूकांत आम्हाला तालुक्याने संधी दिली आहे. तीच संधी कारखान्यात दिली तर आम्ही निश्चित कारखाना सुरू करण्यास कटिबद्ध आहे. सत्ता करण्यास संधी दिल्यास साडेबाराशे टनी अत्याधुनिक कारखाना, कामगार व सभासदांची थकित देणी उभी करण्यासाठी वित्तीय संस्था अथवा बाजार समितीच्या ठेवींतून जमीनीची विक्री करण्याचा आमचा मानस असून आम्ही घराणे शाही वाढविण्यासाठी नाही, तर कारखाना सुरू करण्यासाठी कटिबद्ध असून सभासदांनी खऱ्या शेतकरी पुत्रांना संधी देण्याचे आवाहन प्रकाश जगताप यांनी दिले आहे.
प्रशांत काळभोर म्हणाले, कारखाना भविष्यात चालू होण्यासाठी निवडणूक बिनविरोध करणे आवश्यक होते. मात्र आपल्या घरातील मंडळी कारखान्यावर जावी व त्यांची पुढची पिढी कारखान्यात शिरकाव करावी म्हणून अट्टाहासाने निवडणूक लावली गेली. परंतु कारखाना निवडणुकीत ही मंडळी मागील काळात कारखाना बंद कसा झाला ? एक लाख पोत्यांची विक्री परवानगी घेऊन साडेचार लाख पोती कोणी विकली ? खरेदी विक्री संघाची किती जागा विकली ? अडीच हजार टनीचा हा कारखाना विस्तारीकरण करुन काय साधले ? या प्रश्नांची उत्तरे प्रचाराचा काळात देत नाहीत. उलट खालच्या भाषेत जाऊन वैयक्तिक टिका टिप्पणी करुन करणे हा इचकाच अजेंडा पुढील पॅनेलचा आहे. आम्ही कारखाना बंद पाडल्याचे पुराव्यानिशी मुद्दे मांडले आहेत. त्यामुळे जे जबाबदार आहे ते कारखाना कसा सुरू करतील असा प्रश्न प्रशांत काळभोर यांनी उपस्थित केला.
प्रचार सांगता सभेस विकास दांगट, पांडुरंग काळे, माणिकराव गोते, संतोष कुंजीर, चित्तरंजन गायकवाड, आण्णा महाडीक, जितेंद्र बडेकर, संतोष कुंजीर आदींंची भाषणे सभेत झाली.