तुर्कीची पाकिस्तानला मदत, सहा विमानामधून पाठवला शस्त्रसाठा, आता युद्ध अटळ?

कराची : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. यामुळे अनेकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. यानंतर भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांना अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यामुळे सध्या दोन्ही देशामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तसेच आता भारताने कितीही मदत केली तरी तुर्कस्तान हा पाकिस्तानच्याच बाजुने उभा ठाकला आहे. भारताविरोधात लढण्यासाठी तुर्कीने पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर लष्करी शस्त्रसामुग्री पाठविली आहे. तुर्कीच्या लष्कराचे एअर फोर्स सी १३० हे मालवाहू हर्क्युलिस विमान रविवारी कराची विमानतळावर उतरले आहे.
या विमानामध्ये तुर्कीचा धोकादायक ड्रोन बायरकतार आणि अन्य शस्त्रास्त्रे आहेत. भारताविरोधात लढण्यासाठी तुर्की पाकिस्तानला मोठी लष्करी मदत करत आहे. या दोन्ही देशांनी एकमेकांना लष्करी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. यानुसार ही मदत केली जात आहे.
तुर्कीने एक-दोन नव्हे तर सहा मालवाहू विमाने पाकिस्तानला पाठविली आहेत. ही विमाने इस्लामाबाद विमानतळावरही उतरविण्यात आली आहेत. तुर्कीच्या मदतीने पाकिस्तान भारताला एलओसीवर टक्कर देणार आहे. पाकिस्तानी आणि तुर्कीच्या सुत्रांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे पाठविण्यात आल्याचे सांगितले आहे. परंतू, त्यात काय आहे हे मात्र त्यांना सांगितलेले नाही.
दरम्यान, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर आणि काश्मीरवरून भारत-पाकिस्तान संघर्षानंतर, तुर्की पाकिस्तानच्या पाठीशी उभा राहिला आहे. वेळोवेळी तुर्कीने पाकिस्तानची बाजू घेतलेली आहे. तरीही भारत नेहमी तुर्कीची मदत करत आला आहे. तुर्की, पाकिस्तान आणि चीनमधील वाढत्या संरक्षण संबंधांवर यामुळे प्रकाश टाकला गेला आहे. पाकिस्तान या दोन देशांच्या जिवावरच भारतासोबत युद्धाची खुमखुमी बाळगून आहे