ज्यांच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करतात, ते ही अतिरेकीच!! दररोज 8 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सरकार काय करतंय?

माळसोन्ना : राज्यकर्त्यांच्या धोरणामुळे राज्यात शेतकरी आत्महत्या वाढू लागल्या आहेत. दररोज सात ते आठ शेतकरी कर्जास कंटाळून आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्याच्या वेदना आंधळ्या व बहिऱ्या सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आजपासून माळसोन्ना येथून पदयात्रेस सुरवात झाली.
परभणी जिल्ह्यातील माळसोन्ना येथे १५ दिवसापुर्वी कर्जास कंटाळून सचिन जाधव व त्याच्या ७ महिन्याच्या गर्भवती पत्नीने एकाच दिवशी आत्महत्या केली. जावई आत्महत्या केल्याने विधवा मुलींची कसे पालनपोषण कसे करायचे या विवंचनेत याच गावातील भगवान टाकळे या शेतक-याने आत्महत्या केली. यासारख्या दररोज वेगवेगळ्या आत्महत्या महाराष्ट्रात घडू लागल्या आहेत.
असे असताना मात्र राज्यातील संवेदनहिन राज्यकर्ते याकडे सोईस्कर दुर्लक्ष करू लागले आहे. यामुळे महाराष्ट्र ही शेतकरी आत्महत्येची स्मशानभुमी झालेली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे शेती व्यवसाय तोट्यात चाललेला आहे. देशातील ६.५० लाख हेक्टर त राज्यातील ३.५० लाख हेक्टर शेतीपासून कमी झालेली आहे हे विदारक चित्र केंद्र व राज्य सरकारच्या अपयशाचा आरसा आहे.
उद्योगपतींच्या फायद्यासाठी राबविण्यात येणारे आयात -निर्यात धोरण , नैसर्गिक आपत्ती , सततची नापिकी , पिकविमा कंपन्यांची नफेखोरी , दुष्काळ , महापूर , अतिवृष्टी यासारखी संकटांनी शेतकरी मेटाकुटीस आला आहे. राज्यकर्त्यांनी वेळीच याकडे लक्ष न दिल्यास देशातील १५० कोटीहून अधिक जनतेला दोन वेळ पुरेल एवढे धान्य निर्मीती थांबल्यास भुकबळीची संकट देशावर यायला वेळ लागणार नाही.
माळसोन्ना येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी सचिन जाधव यांच्या प्रतिमेस अभिवादन करून आक्रोश पदयात्रेस सुरवात करून सावळा येथे मुक्काम करण्यात आले. उद्या सकाळी ठिक ७ वाजता सावळा येथून पदयात्रेस सुरवात होवून परभणी कृषी विद्यापीठ मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचणार आहे.
या पदयात्रेत युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष दामू इंगोले, परभणी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, प्रकाश पोपळे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अजित पोवार, शिरोळ पंचायत समितीचे उपसभापती सचिन शिंदे, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष कृष्णा साबळे, माऊली मुळे, डॅा. बाळासाहेब पाटील, विक्रम पाटील, रावसाहेब आलासे, नितेश कोगनोळे, नामदेव भराडे, संभाजी यादव, तानाजी मगदूम यांचेसह पदाधिकारी व परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात पदयात्रेत सहभागी होते.