बारामतीहून दहीहंडीसाठी निघाले अन् दिवे घाटात काळाचा घाला; बाईक घसरली, रस्त्यावर पडताच भरधाव वाहनाने तरुणाला चिरडलं

पुणे : दहीहंडीचा उत्सव पाहण्यासाठी बारामतीहून पुण्याकडे निघालेल्या तीन तरुणांच्या आनंदाच्या प्रवासावर दिवे घाटात काळाने घाला घातला. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने बाईक रस्त्यावर घसरली आणि तिघेही खाली पडले. याचवेळी मागून आलेल्या भरधाव वाहनाच्या चाकाखाली एक तरुण आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. गौरव चव्हाण (वय १८, रा. आमराई, बारामती) असे मृत तरुणाचे नाव आहे. अन्य दोन तरुण जखमी झाले असून त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बारामतीच्या आमराई परिसरातील हे तीन तरुण दहीहंडी उत्सवासाठी पुण्याकडे दुचाकीवरून निघाले होते. दिवे घाटात पोहोचताच दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटले. काही क्षणांतच बाईक रस्त्यावर घसरली आणि तिघेही खाली कोसळले.

तिघे रस्त्यावर पडताच मागून आलेल्या वाहनाची धडक झाली. वाहनाच्या चाकाखाली गौरव चव्हाण आल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.


घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. जखमी दोन्ही तरुणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दहीहंडीच्या उत्सवासाठी पुण्याकडे जात असताना झालेल्या या दुर्घटनेमुळे बारामतीच्या आमराई परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
उत्सवाच्या काळात दुचाकीवरून प्रवास करताना वेगावर नियंत्रण ठेवणे, हेल्मेट घालणे आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेने पुन्हा अधोरेखित केले आहे.