शिवभक्तांचा प्रवास होणार सुखकर, 6 जुनच्या राज्याभिषेक दिनानिमित्त प्रशासनाचा मोठा निर्णय…

रायगड : किल्ले रायगडावर 5 आणि 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा होणार आहे. या सोहळ्यासाठी रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर, मुंबई यासह राज्यभरातून अनेक ठिकाणांहून लाखो शिवभक्त येणार आहेत. हा उत्सव म्हणजे लाखो शिवभक्त याठिकाणी जमा होतात. यामुळे आता प्रशासन कामाला लागले आहे.
आता यामध्ये मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी 5 जून रोजी सायंकाळी 4 ते 6 जून 2025 रोजी रात्री 10 पर्यंत जड आणि अवजड वाहनांना बंदी असणार आहे. रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी हा निर्णय घेतला आहे.
यामध्ये वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि शिवभक्तांचा प्रवास सुखकर होण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. याठिकाणी अनेकदा मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. रायगडावर जाण्यासाठी माणगांव-निजामपूर मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, माणगांव ढालघरफाटा मार्गे पाचाड ते रायगड किल्ला आणि महाड नातेखिंड मार्गे पाचाड ते रायगड किल्ला हे तीन मार्ग आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावरून कशेडी घाट ते महाड आणि वाकणफाटा- नागोठणे-कोलाड-माणगांव-महाड मार्गे ही वाहने येणार आहेत. याच मार्गावरून जड आणि अवजड वाहनांचीही खूप वाहतूक असते. यामुळे अनेकदा गर्दी होते. आणि सगळे नियोजन कोलमडते. त्यामुळे अपघात आणि वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते.
यामुळे शिवभक्तांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी जावळे यांनी अवजड वाहतूक बंदीचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले, श्री शिवराज्याभिषेक सोहळा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.