पुरंदर विमानतळाचा प्रश्न दोन महिन्यांत मार्गी, उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही..

पुणे : ‘पुरंदरच्या प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी लागणारी सुमारे पाच हजार कोटींची रक्कम अदानी समूहाने देण्याची तयारी दर्शविली आहे. या संदर्भातील अंतिम निर्णय अजून झालेला नाही. लवकरच एक बैठक घेऊन निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. येत्या दोन महिन्यांत पुरंदरच्या विमानतळाचा प्रश्न मार्गी लागेल,’ अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी दिली.
उद्योगमंत्री सावंत यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले राज्य सरकारला ही रक्कम एका टप्प्यात उपलब्ध करून देणे शक्य नाही, तर अदानी उद्योग समूहाने ही रक्कम राज्य शासनाला उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली आहे.
तसा प्रस्तावही त्यांनी दिला आहे. या निधीच्या माध्यमातून विमानतळासाठीचे भूसंपादन होऊ शकते. यासंदर्भात अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह लवकरच एकत्रित बैठक होईल. त्यामध्ये सर्व गोष्टींचा विचार करून निर्णय घेण्यात येईल. त्यानुसार पुढील दोन महिन्यांत हा प्रश्न सुटलेला असेल, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
आठ वर्षांपूर्वी पुरंदर तालुक्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी सर्व मंजुरीची प्रक्रिया करण्यात आलेली आहे. केंद्र आणि राज्य सरकार तसेच संरक्षण मंत्रालय आणि एअरपोर्ट अॅथॉरिटी यांनीही या विमानतळाच्या टेकऑफला ग्रीन सिग्नल दाखविला आहे.
या विमानतळासाठी सात गावांमध्ये २ हजार ८३२ हेक्टर जागेचे भूसंपादन करावे लागणार आहे. त्यासाठी भूसंपादनाचा मोबदला निश्चित झाला असला, तरी त्यासंबंधीचा भूसंपादनासाठीचा निर्णय प्रलंबित होता.
त्यातच निश्चित झालेल्या जागेला स्थानिक लोकप्रतिनिधींसह ग्रामस्थांनी विरोध दर्शविला. निश्चित झालेल्या जागेपासून पूर्वेच्या दिशेला दहा ते पंधरा किलोमीटर अंतरावरील पर्यायी जागेचा प्रस्ताव देण्यात आला होता.
त्यामुळे केंद्र सरकारकडून देण्यात आलेली परवानगी रद्द करण्यात आली. त्यामुळे पुरंदर विमानतळाचा प्रश्न रखडला. आता राज्यात पुन्हा शिवसेना-भाजपचे सरकार आल्यानंतर विमानतळाला गती मिळाली.