शासन आपल्या दारी नव्हे तर शासन आपल्या गावी ! महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मोठी घोषणा…!

नगर : सरकारी दाखले मिळण्यासाठी नागरिकांची होणारी वणवण कमी व्हावी आणि हे दाखले त्यांना गावातच उपलब्ध व्हावेत, यासाठी महसूल विभागातर्फे शासन आपल्या दारी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये सरकारी अधिकारी गावागावांत शिबिरे घेऊन दाखल्यांचे वाटप करणार आहेत, अशी माहिती महसूलमंत्री तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
येत्या पंधरा दिवसांत अहमदनगर जिल्ह्यांतील सर्व तालुक्यांत ही मोहीम राबविण्याच्या सूचना विखे पाटील यांनी दिल्या आहेत. सरकारी कार्यालयांमधून आवश्यक असलेल्या सर्व योजनांसाठीचे कागदपत्र, दाखले नागरिकांना सहज सोप्या पध्दतीने उपलब्ध व्हावेत, म्हणून सर्व तालुक्यांमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. या माध्यमातून जनतेच्या समस्याही जाणून घेण्याच्या सूचना महसूल विभागातील अधिका-यांना दिल्या आहेत.
महसूल विभागातून आवश्यक असलेले दाखले मिळण्यास बहुतांशी वेळा विलंब होतो. योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या कागपत्रांमध्ये त्रृटीही असतात. त्यामुळे सामान्य माणसाला योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागते. शाळा, महाविद्यालयांच्या कामकाजासाठी आवश्यक असलेल्या दाखल्यांकरिताही विद्यार्थ्यांना निर्माण होणा-या अडचणी प्रवेशापूर्वी दूर व्हाव्यात, शिधापत्रिका, संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आवश्यक असलेले कागदपत्र नागरिकांना सहज उपलब्ध व्हावेत हा या मागील उद्देश आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
गावांमध्ये या उपक्रमाचे शिबिर आयोजित करण्यापूर्वी नागरिकांना माहिती कळवावी, तसेच महसूल विभागातील सर्व योजनांचे स्वतंत्र विभाग करून नागरिकांचे अर्ज दाखल करुन त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, अशा सूचना अधिका-यांना दिल्या आहेत, असे विखे म्हणाले.