मोठी राजकीय उलथापालथ! 20 जूनला ठरणार ठाकरे गटाच्या 6 खासदारांचे भविष्य; संसदेतून होणार मोठी घोषणा

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या कथित बंडानंतर आता पुढील काही दिवस निर्णायक ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 20 जून रोजी संसदेकडून या प्रकरणासंदर्भात महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील काही खासदारांनी पक्ष नेतृत्वापासून अंतर ठेवल्याचे दिसून येत आहे. दिल्लीत झालेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीला सहा खासदारांनी गैरहजर राहिल्यानंतर राजकीय चर्चांना अधिक वेग आला. या खासदारांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याचे संकेत मिळत असून ते मुख्यमंत्रीपदाच्या काळात शिवसेनेतून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवू शकतात, अशी चर्चा आहे.
राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित खासदारांनी संसदीय स्तरावर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे 20 जूननंतर संसदेच्या अधिकृत नोंदींमध्ये बदल दिसू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

दरम्यान, या घडामोडींमुळे ठाकरे गटात अस्वस्थता वाढली आहे. पक्षाने गैरहजर खासदारांना नोटिसा बजावत स्पष्टीकरण मागितले असून पुढील कारवाईचे संकेतही दिले आहेत. दुसरीकडे, शिंदे गटाकडूनही या संभाव्य राजकीय घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याचे समजते.

बंडाच्या चर्चेत असलेल्या खासदारांमध्ये परभणीचे संजय जाधव, यवतमाळ-वाशिमचे संजय देशमुख, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे आणि ईशान्य मुंबईचे संजय दीना पाटील यांची नावे चर्चेत आहेत.
20 जून रोजी नेमकी कोणती घोषणा होते आणि महाराष्ट्राच्या राजकारणात कोणते नवे समीकरण आकार घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा पातळीवर ठाकरे गटाची ताकद कमी होणार की शेवटच्या क्षणी राजकीय समीकरण बदलणार, याचे उत्तर पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.