१४ वर्षानंतर संपली ‘यशवंत’ची जमिन विक्रीची संघर्षमय प्रक्रिया; कारखान्याची ९९.२७ एकर जमीन पुणे बाजार समितीला विक्रीचा शासन आदेश जारी..

उरुळी कांचन : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने थेऊर (ता.हवेली ) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची ९९.२७ एकर जमीन पुणे बाजार समितीला विक्री करण्याची मंजुरी दिल्यानंतर राज्य पणन विभागाचे उपसचिव अ.पा.शिंगाडे यांनी जमीन विक्रीचा शासन निर्णय काढून कारखान्याची जमीन विक्रीची प्रक्रिया सुरू करण्याचे अटी व नियम लागू करुन निर्देश मिळाल्याने कारखाना जमीन विक्रीची १४ वर्षांपासून रखडलेल्या प्रक्रियेला पुर्णविराम मिळाला असून सभासद , कामगार व भूमिपुत्रांचा लढ्यात अखेर यश मिळाले आहे.

कारखान्याची विक्रीसाठी असलेली ९९.२७ एकर जमीन पुणे बाजार समितीने खरेदीचा प्रस्ताव बाजार समितीने साखर आयुक्त यांच्या मार्फत शासनास सादर केला होता. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मधील कलम १२ (१) नुसार मंजुरी प्रस्ताव पणन संचालक यांनी शासनास दिल्यानंतर या प्रस्तावाला मंजुरी मिळून राज्य मंत्रिमंडळाने प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर पणन उपसचिव अ.पा.शिंगाडे यांनी शासन आदेश काढला आहे.
त्यानुसार कारखान्याची गट क्र.१ (जमीन क्षेत्र ४२ गुंठे), गट क्र.२ (जमीन क्षेत्र २२४० गुंठे), गट क्र.३४ (जमीन क्षेत्र ३६० गुंठे), गट क्र.३६ (जमीन क्षेत्र ८५६ गुंठे), गट क्र.३७ (जमीन क्षेत्र २९८ गुंठे), गट क्र.४१/१ (जमीन क्षेत्र १९१ गुंठे) अशी एकूण ३९८७ गुंठे (९९.२७ एकर) जमीन रु.२९९.०० कोटी किंमतीस विक्री करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे कारखान्याची ९९.२७ विक्रीला कारखान्याचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक यांच्या अधिकारात तर पुणे बाजार समितीला सभापती व सचिव यांच्या अधिकारात जमीन विक्रीचे अधिकार प्राप्त झाले आहे. त्यानुसार पणन विभागाच्या अटी व नियमाला अधिन राहून हा व्यवहार पूर्ण करण्याचे अधिकार बहाल झाले आहे. त्यानुसार कारखान्याला जमीन विक्रीतून २९९ कोटी रुपये रक्कम अदा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार गठीत नियमावलीमार्फत हा व्यवहार पूर्ण होणार आहे.

“कारखान्याला जमीन विक्रीच्या प्रक्रियेस प्रतिसाद मिळत नसताना कारखान्याची जमीन पुणे बाजार समितीलाच विक्री करण्याची परवानगी मिळाल्याने समाधान आहे. भांडवल उभारणी, बँकांची देणी व सभासद,कामगार देणी भागवली जाणार आहे. अत्याधुनिक व कमी खर्चिक प्लॅन्ट उभा करुन कारखाना सुरू करण्यास प्राधान्य देणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार,पणनमंत्री जयकुमार रावल, आमदार ज्ञानेश्वर कटके, राहुल कुल यांचे या कामी महत्वपूर्ण मदत मिळाली आहे. कारखाना सुरू होण्यासाठी सभासद व कामगार वर्गाची मते विचारात घेतली जाणार आहे”
– सुभाष जगताप , अध्यक्ष यशवंत सहकारी साखर कारखाना.