राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई चुकीची,ही घाईघाईत केलेली कारवाई : बच्चू कडू

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्यानंतर त्याचे पडसाद राज्यात उमटले आहेत. राज्यभरात ठिकठिकाणी राहुल गांधींवर झालेल्या कारवाईविरोधात आंदोलन केले जात आहे. काल विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी ठाण मांडत तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून मूक आंदोलन केले. यादरम्यान प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख,आमदार बच्चू कडू यांनी राहुल गांधींवर झालेली कारवाई चुकीची असल्याचे म्हटले आहे, तसेच आपली आमदारकी गेली तर आपल्याला आनंदच होईल, असेही ते म्हणाले आहेत.
राहुल गांधींवर झालेल्या कारवाईवर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई चुकीची वाटते. ही घाईघाईत केलेली कारवाई आहे. अशी घाई सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी करावी. सरकारने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले पाहिजे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
राहुल गांधी यांच्याप्रमाणेच राज्यात बच्चू कडू यांचीही आमदारकी रद्द व्हायला हवी, अशा आशयाचे पोस्टर्स राज्यात लागले आहेत. त्यावरही बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडू यांनाही शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना बच्चू कडू म्हणाले, बॅनर लावलेले कार्यकर्ते अतिउत्साही आहेत. मी केलेले आंदोलन स्वत:साठी नाही तर अपंग बांधवांसाठी केले.