Supriya Sule : वक्फ बोर्डवरून सुप्रिया सुळे यांच्याकडून अजित पवारांची मोठी कोंडी, म्हणाल्या तुम्हाला बोलावं लागेल, पळपुटेपणा…

Supriya Sule : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना सुप्रिया सुळेंनी वक्फ बोर्ड संशोधन बिलाच्या मुद्द्यावरून अजित पवारांची कोंडी केल्याचं पाहायला मिळालं. कुणीतरी लढले पाहिजे. सगळेच हाजी हाजी करायला लागले तर देश कसा चालणार?
आज आमच्या घरात घुसले,उद्या तुमच्या घरात घुसतील. ही लढाई तत्वांची आहे. जो अन्याय आमच्यावर केला. जो अन्याय पवार साहेबांवर, उद्धव साहेबांवर केला. हा दुसऱ्यांवर करता कामा नये. जर आम्ही ऐकून घेतले तर यांना वाटेल पाहिजे ते आम्ही करू शकतो. हे या देशात चालणार, असे म्हणत त्यांनी निशाणा साधला आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, हा देश अदृश्य शक्तीच्या मनमानीने चालणार नाही. हा देश बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार चालणार. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही सगळ्या यंत्रणा चालवू शकता? कधी न कधी वेळ येईल, जेव्हा हा देश कुणाच्या मनमानीने नाही तर संविधानानेच चालेल. कष्टाची पराकाष्ठा करू, पण हा अन्याय बंद करू.
लोकसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने तुम्ही मला आशीर्वाद दिला. तिथे गेल्यानंतर ते म्हणायला लागले वक्फ बोर्डचे असे करू, तसे करू. मी म्हटलं नाही चालणार. वक्फ बोर्डबद्दल ज्या समाजाचा प्रश्न आहे, त्या समाजाचे ऐकल्याशिवाय आम्ही तुम्हाला वक्फ बोर्डमध्ये बदल करू देणार नाही. तुम्ही त्या समाजाला विचारा. मानसन्मान करा ना”, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.
त्या पुढे म्हणाल्या, बदल करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आता बारामतीत बदल करायचा, तर बारामतीकरांना विचारा की, बदल करायचा की नाही करायचा? लोकशाही आहे, मनमानी नाही चालणार. मला तर काय ट्रोल केले. काय बोलायचं ते बोला, मला फरक पडत नाही. Supriya Sule
कारण माझं मन साफ होतं. वक्फ बोर्डच्या वेळी जेव्हा मतदान झालं, तेव्हा या राज्यातील किती पक्षांनी मतदान केलं? याचेही उत्तर त्यांना द्यावं लागेल. ज्यांना सोयीचं होतं, ते तिथून गायब झाले. असं नाही चालणार… हो किंवा नाही, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी अजित पवारांची नाव न घेता कोंडी केली.
लोकसभेत निवडणूक गेलात ना, मग पळपुटेपणा नाही चालणार. तुम्ही सोबत आहात की विरोधात, हे तुम्हाला बोलावं लागेल. का त्यांनी मतदान केलं नाही? त्या पक्षाने उत्तर दिलं पाहिजे. महाराष्ट्रात तुम्ही सत्तेमध्ये आहात ना? मग सांगा तुमच्या खासदाराने वक्फ बोर्डच्या बाबतीत तुमची भूमिका काय आहे? तुम्ही वक्फ बोर्डच्या बाजूने की विरोधात? याचे उत्तर त्यांना द्यावं लागेल. कारण की, त्याचं उत्तर त्यांनी दिलेलंच नाही आजपर्यंत “, असे म्हणत सुळेंनी विरोधकांना लक्ष्य केले आहे.