सोनम वांगचूक यांचा मोठा निर्णय! ‘या’ अटी मान्य झाल्यासच उपोषण मागे; जंतरमंतरवर तणाव कायम

नवी दिल्ली : जंतरमंतर मैदानावरील आमरण उपोषणादरम्यान प्रकृती खालावल्याने दिल्ली पोलिसांनी पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. या कारवाईनंतर सोमवारी सकाळी त्यांनी महत्त्वाची भूमिका मांडत, केंद्र सरकारने काही अटी मान्य केल्यास आपण आमरण उपोषण मागे घेण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले.

सोनम वांगचूक यांनी म्हटले आहे की, नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण आणि शिक्षण व्यवस्थेतील गंभीर त्रुटींबाबत केंद्र सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी. तसेच, त्यांना आणि आंदोलनातील प्रतिनिधींना संसदेत जाऊन खासदारांशी चर्चा करण्याची परवानगी द्यावी किंवा संसदेतील नेत्यांनी रुग्णालयात येऊन या प्रश्नांवर संसदेत आवाज उठवण्याचे ठोस आश्वासन द्यावे. या अटी पूर्ण झाल्यास ते उपोषण मागे घेण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या रुग्णालयात त्यांच्या हालचाली आणि संपर्कावर निर्बंध असल्याचाही दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, वांगचूक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर आंदोलन थांबेल, अशी अपेक्षा होती. मात्र, अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन अधिक तीव्र झाले असून जंतरमंतर परिसरात आंदोलकांची संख्या वाढत आहे. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान काढण्यात येणाऱ्या मोर्चाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली असली, तरी आंदोलक माघार घेण्याच्या भूमिकेत नाहीत. या आंदोलनात विविध राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी होण्याची शक्यता व्यक्त होत असून, दिल्लीतील राजकीय वातावरण आणखी तापले आहे. त्यामुळे केंद्र सरकारची पुढील भूमिका आणि आंदोलनाची दिशा याकडे देशभराचे लक्ष लागले आहे.
