Sharad Pawar : देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे पण…!! शरद पवारांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?


Sharad Pawar : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस ही महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचे सांगतात. आपण सगळे सरकार आणि अर्थमंत्र्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवत असतो. पण विधानसभा निवडणूक संपल्यानंतर एक-दोन महिन्यांमध्ये राज्याची खरी आर्थिक स्थिती समोर येईल, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.

ते शनिवारी बारामतीच्या गोविंद बागेतील मेळाव्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाच्या अहवालाबाबत भाष्य केले आहे.

या अहवालात देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची आर्थिक क्षेत्रातील कामगिरी खालावल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. सध्या राज्यातील सत्ताधाऱ्यांनी काही योजनांसाठी गरीबांसाठी असणाऱ्या योजनांचा निधी वळविला आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून गरीबांच्या पदरात काहीही पडलेले नाही, असा आरोप शरद पवार यांनी केला. Sharad Pawar

शरद पवार पुढे म्हणाले की, मला महाराष्ट्राच्या आजच्या स्थितीची चिंता वाटते. कारण काही महत्त्वाचे प्रश्न हाताळायला सध्याच्या राज्यकर्त्यांना अपयश आलं आहे. केंद्र सरकार अर्थखात्याशी संबंधित एका विभागाने आर्थिक कामगिरीच्या जोरावर देशातील राज्यांचे रँकिंग जाहीर केले आहे. जे राज्य एकेकाळी क्रमांक एकला होते, ते पहिल्या पाचमध्ये नाही.

याशिवाय, उत्पन्न आणि दरडोई उत्पन्नासंदर्भातही महाराष्ट्रासाठी धक्कादायक परिस्थिती आहे. हा पंतप्रधानांसोबत काम करणाऱ्या लोकांनी तयार केलेला अहवाल आहे. अर्थव्यवस्था मजबूत करायला जी काही पावल टाकली पाहिजेत त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. नुसतं राजकारण करुन प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे परिस्थिती किती गंभीर आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!