पवारांच्या घरातून काँग्रेसकडे नवा प्रवास? रोहित पवारांच्या ‘त्या’ हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या रोहित पवारांच्या पुढच्या राजकीय भूमिकेबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे आमदार रोहित पवार काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चांनी पुन्हा जोर पकडला आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही काळात घडलेल्या तीन महत्त्वाच्या घटनांमुळे या चर्चांना अधिक हवा मिळाली आहे. मात्र, रोहित पवारांनी काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांना स्पष्टपणे नकार दिला असून सध्या हा सस्पेन्स कायम आहे.
रोहित पवार आणि राहुल गांधी यांच्यातील वाढती जवळीक ही चर्चेतील पहिली बाब ठरली आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर रोहित पवारांनी दिल्लीत राहुल गांधींची भेट घेतली होती. त्यानंतरही त्यांनी राहुल गांधींच्या भूमिकेचं समर्थन केल्याने त्यांच्या राजकीय वाटचालीबाबत तर्क-वितर्क सुरू झाले. मात्र, राज्यात विधानसभेत आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते नसल्याने राष्ट्रीय पातळीवरील विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांच्याशी संपर्क ठेवत असल्याचं रोहित पवारांनी सांगितलं आहे.

दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून नागपुरात आंदोलनाचा इशारा. या आंदोलनासाठी रोहित पवारांनी थेट राहुल गांधींना निमंत्रण दिलं आहे. स्वपक्षातील नेत्यांऐवजी राहुल गांधींना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केल्याने राजकीय चर्चांना आणखी उधाण आलं. आदिवासींचा प्रश्न केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून राष्ट्रीय पातळीवरचा मुद्दा असल्याचं रोहित पवारांचं म्हणणं आहे.


तिसरी बाब म्हणजे काँग्रेस नेत्यांशी झालेल्या भेटीगाठी. रोहित पवारांच्या आंदोलनावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे दोन्ही पक्षांमधील जवळिकीची चर्चा आणखी वाढली. त्यातच पुण्यात राहुल गांधी यांच्या ‘छात्रो की गुंज’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांच्या स्वागताचे बॅनरही चर्चेचा विषय ठरले होते.
या सगळ्या घडामोडी एकत्र पाहिल्या तर रोहित पवार काँग्रेसच्या दिशेने वाटचाल करत आहेत का? असा सवाल उपस्थित होणं स्वाभाविक आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांकडून त्यांच्या संभाव्य प्रवेशाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया आल्याचीही चर्चा आहे. मात्र, स्वतः रोहित पवारांनी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चांचं खंडन केलं आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या राजकीय हालचालींमागे नेमकी रणनीती काय आहे, याबाबतचा सस्पेन्स कायम आहे.
राहुल गांधींची भेट, नागपूर आंदोलनासाठी दिलेलं निमंत्रण आणि काँग्रेस नेत्यांशी वाढलेला संवाद या तीन गोष्टींमुळे रोहित पवारांच्या पुढच्या राजकीय पावलाकडे आता महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.