राज्यात ‘या’ भागात पडणार पाऊस, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज..

मुंबई : राज्यात उन्हाचा कडाका वाढल्याने नागरिक हैराण झाले आहे. तसेच अनेक शहरांमध्ये तापमान चाळीशी पार गेले आहे. अकोला येथे सर्वाधिक ४४.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.
ही उष्णतेची लाट कायम राहणार असून, विदर्भात तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही उन्हाच्या तीव्र झळा जाणवत आहेत.
सोलापूर, अमरावती , यवतमाळ या शहरांचे तापमान ४० अंशांपुढे गेले आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत राज्यातील बहुतांश भागांतील कमाल तापमानात आणखी २ ते ३ अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, त्यामुळे उकाडा आणखी वाढेल.
दरम्यान, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसानंतर आता पुन्हा उन्हाचा चटका वाढला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान मुख्यतः कोरडे आणि काही ठिकाणी दमट राहण्याची शक्यता आहे.
इतर शहरांच्या तुलनेत मुंबईचे तापमान सध्या काहीसे कमी (सुमारे ३२ अंश सेल्सियस) असले तरी, हवेतील जास्त आर्द्रतेमुळे मुंबईकर उकाड्याने त्रस्त आहेत. पुढील आठवड्यात आर्द्रता कमी होऊन तापमान वाढण्याची शक्यता असल्याने उष्णतेचा त्रास कायम राहू शकतो.