दिवाळीवर पावसाचे सावट, हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा, तुमच्या शहरात हवामान कसे असेल?

पुणे : मोसमी पावसाचे ढग परतले असले तरी, अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी सुरूच आहे. दिवाळीच्या तोंडावरही पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने चिंता वाढली आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने आगामी काही दिवसांसाठी पावसाचा इशारा दिला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २० ते २५ ऑक्टोबर या कालावधीत राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. या काळात केरळ , तामिळनाडू, लक्षद्वीप, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

आज कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. तसेच, पुणे, रत्नागिरी, सातारा , सांगली, आणि लातूर या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्ये पुढील आठवडाभर पावसाचा प्रभाव राहणार असून, २१ ऑक्टोबरपर्यंत तामिळनाडू, पुद्दुचेरी येथे हलका ते मध्यम, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस अपेक्षित आहे. छत्तीसगड , नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामध्येही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.
राज्यातील पावसाचे संकट अद्याप टळलेले नाही. पुढील तीन दिवसांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे दिवाळीच्या उत्साहावर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे.
