महाराष्ट्रात राजकीय भूकंप; मंत्रिमंडळातील आठ मंत्र्यांना मिळणार नारळ?नावं समोर

पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्य करणारे आणि विविध कारणामुळे अडचणीत आलेल्या 8 मंत्र्यांना मुख्यमंत्री बाहेरचा रस्ता दाखवणार आहेत.यात भाजपचे दोन, शिंदे गटातील चार आणि पवार गटातील दोन मंत्र्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

शिंदे गटाच्या तीन ते चार मंत्र्यांना संभाव्य फेरबदलात नारळ दिला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये वादग्रस्त ठरलेले सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, मंत्री भरत गोगावले, शिक्षणमंत्री दादा भुसे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा समावेश आहे. तर अजित पवार गटातील धनंजय मुंडे यांचा संतोष देशमुख प्रकरणामुळे आधीच राजीनामा झाला आहे. त्यापाठोपाठ आता सातत्याने वादग्रस्त ठरणाऱ्या माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असल्याची चर्चा आहे. तसेच, नरहरी झिरवळ यांनाही मंत्रिपद गमवावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपकडून मंत्रिमंडळात स्थान मिळालेले मत्स्यविकास मंत्री नितेश राणे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून सातत्याने वादग्रस्त वर्तन केले जात आहे. त्यामुळे त्यांचेही मंत्रिपद धोक्यात आले आहे.. मात्र या संभाव्य फेरबदलांमुळे राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
