“कानशिलात लगावल्याशिवाय शांत बसणार नाही”; प्रसाद लाडांना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा थेट इशारा, आरक्षणाच्या वादाने घेतलं धोकादायक वळण


मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, भाजप आमदार प्रसाद लाड आणि ओबीसी आंदोलनाचे प्रमुख नेते लक्ष्मण हाके यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचल्याचे दिसत आहे. प्रसाद लाड यांनी मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर सातत्याने टीका केल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत थेट इशाराच दिला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर प्रसाद लाड यांनीही जरांगे यांच्या आंदोलनावर आणि त्यांच्या भूमिकेवर जोरदार निशाणा साधला होता. त्यानंतर जरांगे यांनी चर्चेसाठी बोलावल्यावर प्रसाद लाड त्यांच्या भेटीस गेले. या भेटीदरम्यान काही आंदोलकांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली होती. त्यानंतरही प्रसाद लाड यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका कायम ठेवली.

याच पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीशी बोलताना लक्ष्मण हाके यांनी प्रसाद लाड यांच्यावर संताप व्यक्त केला. “प्रसाद लाड मला कुठेही दिसले तर त्यांच्या कानशिलात लगावल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी मला तुरुंगात जावं लागलं, गोळ्या झाडल्या किंवा कोणतीही कारवाई झाली तरी मी मागे हटणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी इशारा दिला. त्यांनी हा इशारा एकदाच नव्हे तर वारंवार देत आपली भूमिका अधिक आक्रमकपणे मांडली.

हाके यांनी प्रसाद लाड यांच्या “माझ्या मागे माणसं आहेत” या विधानाचाही उल्लेख करत, “तुम्हाला माझ्या मागे किती लोक उभे आहेत हे पाहायचं असेल तर वेळ आल्यावर दिसेल. ओबीसी समाज शांत आहे म्हणजे कमकुवत नाही. हा समाज रस्त्यावर उतरला तर अनेकांचे राजकारण वाहून जाईल,” असा दावा केला.

यावेळी त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका करत आरक्षणासारख्या संवेदनशील विषयावर जबाबदारीने बोलण्याचा सल्ला दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसाद लाड यांच्या वक्तव्यांवर नियंत्रण ठेवावे, अशी मागणीही त्यांनी केली.

मंडल आयोगाच्या शिफारशींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनाही हाके यांनी इशारा दिला. “मंडल आयोगाला आव्हान देण्याचा प्रयत्न झाला तर त्याचे गंभीर राजकीय परिणाम होतील. हा विषय केवळ एका समाजाचा नाही, तर देशातील लाखो ओबीसींच्या हक्कांचा आहे,” असे ते म्हणाले.

दरम्यान, लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवरही टीका करत आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वच बाजूंनी संयम आणि जबाबदारीची गरज असल्याचे सांगितले. मात्र, प्रसाद लाड यांच्याविरोधातील त्यांच्या आक्रमक विधानामुळे मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत असून, या वादावर सरकारकडून किंवा संबंधित नेत्यांकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!