आता कुत्रा, मांजर यांच्यावर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार!! राज्य सरकारचा नवीन आदेश…

मुंबई : राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने एक शासन आदेश काढला आहे. त्यानुसार प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले. मंत्री प्रताप सरनाईक यांनी याप्रकरणी 25 जुलै 2023 रोजी पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. आता आपल्याकडे पूर्वापार कुत्रा, मांजर यांसारखे पाळीव प्राणी पाळले जातात.
अनेकजण त्यांचा पोटच्या मुलांप्रमाणे सांभाळ करत असतात. त्यांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्काराची व्यवस्था अनेक ठिकाणी नसते. बऱ्याचदा प्राण्यांचे मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेले असतात. त्याचा अनेकांना त्रास देखील होतो. काहीजण त्यांना फेकून देतात. याबाबत आपल्याकडे व्यवस्था नाही. यामुळे आता सरकारने याबाबत निर्णय घेतला आहे.
यापुढील काळात पाळीव कुत्रे आणि मांजर यांच्यावर अंत्यसंस्कार करावे लागणार आहेत. याबाबत राज्य सरकारने नुकतेच आदेश दिले आहेत. अनेकदा मृतदेहांची योग्य विल्हेवाट न लावल्याने बऱ्यचदा दुर्गंधी सुटते. त्याचा सर्वांनाच त्रास होतो आणि रोगराई पसरण्याचा धोका देखील असतो. यामुळे आता याबाबत सरकारने निर्णय घेतला आहे.
राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील घनकचरा व्यवस्थापन केंद्राच्या शेजारी पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असे या आदेशात नमूद केले आहे. यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांनी ठरावीक शुल्क आकारून पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी परवानगी द्यावी, असे आदेशात म्हटले आहे.
दरम्यान, मृत प्राण्यांचा अंत्यविधी करताना दुर्गंधी येणार नाही, तसेच रोगराई पसरणार नाही याची दक्षता घ्यावी. मृत पाळीव प्राणी खाडी, तलाव, मोकळ्या जागा, रस्त्याच्या कडेला टाकले जाणार नाहीत याची दक्षता सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी घ्यावी. असेही सांगण्यात आले आहे. यामुळे पुढील काळात हा प्रश्न मार्गी लागणार आहे.