मंत्रालयात प्रवेश मिळवण्यासाठी आता नवीन नियम लागू, काय आहे प्रोसेस? जाणून घ्या…

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने आज एक आदेश जारी केला आहे. यामध्ये आता मुंबईतील मंत्रालयात प्रवेश घेणाऱ्यांसाठी आता महत्त्वाचा बदल होत असून, १५ ऑगस्ट २०२५ पासून ‘डिजी प्रवेश पास’शिवाय मंत्रालयात प्रवेश मिळणार नाही. यामुळे याबाबत माहिती असणे आवश्यक आहे. आता प्रत्यक्ष स्वरूपात पास देण्याची पद्धत थांबवण्यात आली आहे.

तसेच अनेक वयोवृद्ध किंवा ग्रामीण भागातील नागरिकांकडे स्मार्टफोन नसल्याने त्यांच्यासाठी ‘गार्डन गेट’ येथे विशेष काउंटर सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणी मंत्रालयातील प्रवेशाकरता ऑनलाईन नोंदणी करून पास दिला जाईल. मंत्रालयात प्रवेश घेण्यासाठी आता ऑनलाईन पद्धतीचा ‘डिजी प्रवेश पास’ अनिवार्य करण्यात आला आहे.
यासाठी आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड यापैकी शासकीय मान्यताप्राप्त ओळखपत्र सादर करावे लागेल. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आधार क्रमांकावर आधारित प्रणाली फोटोची ओळख पटवेल आणि संबंधित विभागात थेट प्रवेश मिळेल. यामुळे कोणालाही प्रवेशासाठी अडचण येणार नाही, असा दावा प्रशासनाने केला आहे.

सध्या मंत्रालयात दररोज विविध कामांसाठी मोठी गर्दी होत असते. नवीन प्रणालीमुळे अनधिकृत प्रवेश थांबवता येईल, सुरक्षेत वाढ होईल आणि नागरिकांचा वेळ वाचेल. तसेच कोणत्या विभागात कोण आले आहे याचा डिजिटल रेकॉर्ड तयार राहील. संबंधित विभागात ऑनलाइन ‘स्टॉल बुक’ करता येईल आणि रांगेत न थांबता प्रवेश मिळेल. संपूर्ण प्रक्रिया तीन मिनिटांपेक्षा कमी वेळेत पूर्ण होईल, असा दावा करण्यात येत आहे.

यामध्ये डिजीप्रवेश’ हे अँप अँड्रॉईड आणि आयओएस दोन्ही प्रणालींवर उपलब्ध आहे. मोबाईलवर Digi Pravesh असे शोधून हे अँप विनामूल्य डाउनलोड करता येईल. अँपद्वारे नोंदणी करताना आधार क्रमांक चेक केला जाईल. अगदी काही मिनिटात हे काम पूर्ण होईल, सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.