मुंबई हायकोर्टाचा याचिकाकर्त्यांना दणका ; मतदार यादी संबंधितील 4 याचिका फेटाळल्या….

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना मुंबई उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाने याचिकाकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने मतदार यादी संदर्भात दाखल करण्यात आलेल्या चारही महत्त्वाच्या याचिका फेटाळल्या आहेत. त्यामुळे याचिकाकर्त्यांना मोठा झटका बसला आहे. विशेष म्हणजे, एका बाजूला न्यायालयात याचिकांवर सुनावणी सुरू असतानाच दुसरीकडे आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या घोषणेकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई उच्च न्यायालयात मतदार यादी संदर्भातील चार याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या चार याचिकांमध्ये मतदार यादीच्या मसुद्यावर आक्षेप घेण्यासाठी मिळालेला कमी कालावधी, ऑनलाईन अर्ज करूनही यादीत नाव नसणे आणि मतदार यादीतील नाव ट्रान्सफर करण्याची मागणी हे प्रमुख मुद्दे होते. या सर्व याचिकांवर सुनावणी घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने त्या फेटाळून लावल्या आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्या याचा अर्थ, मतदार यादी तयार करण्याच्या प्रक्रियेवर आक्षेप घेणाऱ्या याचिकाकर्त्यांना दिलासा मिळालेला नाही.न्यायमूर्ती छागला आणि फरहान दुबाश यांच्या खंडपीठासमोर याच संदर्भातील आणखी एक याचिकाकर्ती रुपिका सिंग हिच्या याचिकेवर सुनावणीला सुरुवात झाली. रुपिका सिंगने एप्रिल महिन्यात १८ वर्षे पूर्ण केली असतानाही, निवडणूक आयोगाने तिचे नाव मतदार यादीत समाविष्ट केले नाही, असा आरोप याचिकेत करण्यात आला होता.

दरम्यान सध्या मुंबई उच्च न्यायालयात मतदार यादी, सीमांकन आणि आरक्षणाच्या संदर्भात एकूण ४२ याचिका दाखल आहेत. मतदार यादी संदर्भातील याचिका फेटाळल्या असल्या तरी, आरक्षण आणि सीमांकन संदर्भातील अन्य याचिकांवर गुरूवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे यामध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
