जगात एकच धर्म आहे, तो म्हणजे…!! पहलगाम हल्ल्यानंतर मोहन भागवतांचे वक्तव्य चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

मुंबई : जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं झालेला हल्ला कोणा पंथावर किंवा संप्रदायावर झाला नसून, हा संपूर्ण लढा धर्म आणि अधर्माचा असल्याची स्पष्ट प्रतिक्रिया सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिली. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
जगात एकच धर्म मानव धर्म आहे आणि त्यालाच हिंदू धर्म म्हणतात असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हंटलं आहे. आपल्या लोकांनी कधी कोणाला धर्म विचारून मारलं नाही. रावण सुधरला नाही म्हणून रामाने वध केला, असंही मोहन भागवत यांनी म्हंटले आहे.
तसंच दुष्ट माणसांचं निर्दालन होईल अशीही अपेक्षा यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केली. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यावर बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पहलगाममध्ये कट्टरपंथियांनी जे केल ते आपले हिंदू करणार नाही.
ही धर्म आणि अधर्मामधील लढाई आहे, असे सांगून भागवत पुढे म्हणाले, आपल्या मनात दुःख आहे, पण क्रोधही आहे आणि तो असायलाच हवा. कारण असुरांचा नाश करायचा असेल, तर अष्टादशभुजा देवीची शक्ती गरजेची आहे. त्यांनी रावणाचा दाखला देत म्हटले की, काही वाईट प्रवृत्ती सुधारू शकत नाहीत, त्यांचे निर्दालन आवश्यक असते, जसे रामाने रावणाचा वध केला.
दुष्ट प्रवृत्तींचे निर्दालन झालेच पाहिजे. मनात राग आणि अपेक्षा आहेत, आणि यावेळी अपेक्षा पूर्ण होतील असे वाटते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. समाज एकजूट झाल्यास कोणी वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही, पाहिल्यास त्याचे डोळे फुटतील, असा इशाराही त्यांनी दिला. द्वेष आपल्या स्वभावात नाही, पण मार खाणेही नाही. शक्तिशाली व्यक्तीने अहिंसक असावे, पण गरज पडल्यास शक्ती दिसलीच पाहिजे, असे ते म्हणाले.