आमदार रोहित पवार यांनी ईडीकडून आरोपपत्र दाखल होताच केले मोठं वक्तव्य, म्हणाले, माझी तयारी आहे…

मुंबई : आज आमदार रोहीत पवार यांच्यावर ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने त्यांच्यावरआरोपपत्र दाखल केलं आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने २०१९ मध्ये हा गुन्हा दाखल केला होता. याबाबत आता रोहित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

याबाबत तपास अधिकाऱ्यांनी शिखर बँकेचे तत्कालीन अधिकारी आणि संचालकांनी योग्य प्रक्रिया न करता त्यांच्या नातेवाईकांना खासगी व्यक्तींना कवडीमोल किंमतीत सहकारी साखर कारखाना विकल्याचा आरोप केला. यामुळे याबाबत कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत रोहित पवार म्हणाले, कुणाचं आणि काय ऐकलं नाही म्हणून माझ्याविरोधात ED ने कारवाई केली हे जगजाहीर आहे, याबाबत अधिक सांगण्याची गरज नाही. ED चे अधिकारी बिचारे आदेशाचे धनी, त्यांनी केवळ आलेल्या आदेशाचं पालन केलं आणि आता आरोपपत्रही दाखल केलं.

म्हणजेच तपास पूर्ण झाला असून ज्याची आपण वाट बघत होतो त्या निर्णयाचा चेंडू आता न्यायव्यवस्थेच्या कोर्टात आहे. कारण न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास असून यामध्ये ‘दूध का दूध आणि पाणी का पाणी’ होईलच. विचारांसाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी माझी तयारी आहे.

महाराष्ट्राने लाचारीला आणि फितुरीला कधीही थारा दिला नाही आणि संघर्षालाच डोक्यावर घेतलंय, हा इतिहास आहे! अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे. यामुळे सध्या राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. याबाबत येणाऱ्या काळात काय कारवाई होणार हे लवकरच समजेल.