“नवा पक्ष की नवी रणनिती?” जरांगेंच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ


अंतरवाली सराटी : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी नवीन राजकीय पक्ष काढण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर स्पष्ट भूमिका मांडत राजकीय वातावरण तापवले आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी आरक्षण अंमलबजावणीपासून ते राजकारणातील सध्याच्या परिस्थितीपर्यंत अनेक मुद्द्यांवर स्पष्ट मत व्यक्त केले.

मराठा आरक्षणासाठी त्यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले होते. सरकारने मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. त्यानंतर आता आरक्षण अंमलबजावणी आणि शासन निर्णयाच्या पुढील प्रक्रियेवर सरकार काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. “मंगळवारपासून आदेश काढण्याचे काम सुरू होईल. आता कोणाचाही दबाव आला तरी प्रक्रिया थांबणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

जीआर न घेता उपोषण का मागे घेतले, यावर बोलताना त्यांनी सांगितले की, सामान्य जनतेला सर्व माहिती आहे. “मी कधीही लढाईत मागे हटलेलो नाही. मी नेहमी प्रामाणिकपणे लढत आलो आहे,” असे ते म्हणाले. सरकार मराठा समाजावर अन्याय करणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राजकीय पक्षांवर निशाणा साधला. “आज एक पक्ष, उद्या दुसरा पक्ष असा प्रकार सुरू आहे. नेत्यांची मुलं पुढे, कार्यकर्ते मागे अशी परिस्थिती आहे,” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

नवीन राजकीय पक्ष काढणार का? या प्रश्नावर उत्तर देताना जरांगे म्हणाले की, पक्ष काढणे ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी मोठे संघटन, जबाबदारी आणि सातत्य लागते. “पक्ष काढून सर्व समस्या सुटत नाहीत. सध्या माझा पक्ष काढण्याचा कोणताही विचार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

तथापि, समाजासाठी ठोस काम करणारे आणि खमके नेतृत्व आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे “पक्ष नाही, पण भविष्यात मोठा राजकीय संकेत?” अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!