महाराष्ट्रासह 20 राज्यांवर पावसाचं सावट! उद्या कुठे मुसळधार तर कुठे विजांचा कडकडाट? IMDचा मोठा अलर्ट

पुणे : देशातील अनेक भागांत मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून भारतीय हवामान विभागाने 23 ऑगस्टसाठी महाराष्ट्रासह सुमारे 20 राज्यांना पावसाचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, तर काही भागांत मेघगर्जना, वीज आणि वेगवान वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील काही दिवस हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
छत्तीसगड आणि ओडिशाला सर्वाधिक पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 23 ऑगस्ट रोजी या दोन्ही राज्यांतील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल आणि पूर्व उत्तर प्रदेशातही जोरदार पावसाचा अंदाज आहे.

महाराष्ट्रातील विदर्भावरही विशेष लक्ष ठेवण्याची गरज आहे. विदर्भात 23 आणि 24 ऑगस्ट रोजी काही भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशच्या ईशान्य भागात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम मध्य भारतातील हवामानावर होत आहे. पश्चिम मध्य प्रदेशात 22 ते 25 ऑगस्ट, तर पूर्व मध्य प्रदेशात 23 ते 26 ऑगस्टदरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज आहे.


दरम्यान, उत्तर प्रदेशात मान्सून सक्रिय असून पूर्व उत्तर प्रदेशात 22 ते 25 ऑगस्टदरम्यान अनेक ठिकाणी पाऊस होऊ शकतो. 23 ऑगस्टला काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातही काही ठिकाणी जोरदार सरी पडण्याचा अंदाज आहे. मात्र, पुढील काही दिवसांनंतर उत्तर प्रदेशातील पावसाचा जोर हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे.
दिल्लीकरांना मात्र तुलनेने दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राजधानीत 23 ऑगस्ट रोजी आकाश ढगाळ राहू शकते. सकाळपासून दुपारपर्यंत काही भागांत हलक्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. सध्या दिल्लीमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाच्या अंदाजातून स्पष्ट होते.
पावसाचा प्रभाव उत्तराखंड, तेलंगणा, किनारी कर्नाटक, केरळ, अरुणाचल प्रदेश आणि ईशान्येकडील अनेक राज्यांमध्येही जाणवू शकतो. काही भागांत मुसळधार पावसासोबत मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
याशिवाय आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार आणि तामिळनाडू-पुडुचेरीमध्ये ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. या भागांत विजांचा कडकडाट होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे वादळी वातावरणात नागरिकांनी झाडे, विजेचे खांब आणि धोकादायक ठिकाणांपासून दूर राहावे.
दरम्यान, छत्तीसगडमध्ये 24 ते 28 ऑगस्टदरम्यान पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. मध्य भारतातील सक्रिय हवामान प्रणालीमुळे नद्या, नाले आणि ओढ्यांच्या पाणीपातळीत वाढ होऊ शकते. त्यामुळे मुसळधार पाऊस होणाऱ्या भागांतील नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नये.