किमान तीन वर्षे शेतकरी कर्जमाफी देणे अशक्य, अजित पवारांनी स्पष्टच सांगितले..

पुणे : सध्या राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. अशातच महायुती सरकारने कर्जमाफीचे आश्वासन पाळले नाही, विधिमंडळाचे नुकतेच संपलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरेल, अशी अपेक्षा होती. या अधिवेशनातून सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत ठोस पावले उचलेल, असे वाटले होते. असे असताना याबाबत काहीच निर्णय झाला नाही.
अशातच आता यावर उपमुख्यमंत्री यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले आहे की, सध्याच्या स्थितीत राज्याची आर्थिक स्थिती पाहताना किमान तीन वर्षे शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे शक्य नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, शेतकऱ्यांनी ३१ मार्चच्या आधी आपल्या कर्जाची परतफेड करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर झालेल्या शेतकरी मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन आणि शेतकऱ्यांकडून होत असलेली मागणी यावर सरकारची भूमिका स्पष्टपणे मांडली.
गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, हे मान्य करत उपमुख्यमंत्री पवार यांनी, परंतु आता कर्जमाफी देणे अशक्य असल्याचे सांगितले. ते म्हणाले, विधानसभा निवडणुकीत आम्ही आश्वासन दिले होते; पण सध्या राज्याची आर्थिक स्थिती पाहता शेतकऱ्यांना सध्या तर नाहीच; परंतु आणखी किमान तीन वर्षे तरी कर्जमाफी देणे शक्य होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.