भारताने लष्कर-ए-तोयबाचे कंबरडे मोडले, ऑपरेशन सिंदूरमध्ये दोन मोठे दहशतवादी ठार, संघटनेचा मेन शुटरच मारला…

नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्याकाही दिवसांनंतर भारताने दहशतवादाच्या बालेकिल्ल्यात प्रवेश करून जोरदार हल्ला केला. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमध्ये १०० किमी आत घुसून लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीनचे ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला.
या कारवाईत लष्कर-ए-तैयबाचे दोन टॉप कमांडर मारले गेले आहेत. या दोघांनाही लष्करच्या दहशतवादी कारवायांचे सूत्रधार मानले जात होते. यामुळे भारताचे हे मोठं यश मानले जात आहे. यामध्ये हाफिज अब्दुल मलिक जो लष्करचा एक मोठा ऑपरेशनल कमांडर असल्याचे म्हटले जाते. तो मुरीदके येथील लष्कराच्या मुख्यालय ‘मरकझ तैयबा’ येथे उपस्थित होता, त्याठिकाणी हा हल्ला झाला.
तसेच दहशतवादी मुद्दासिर जो परदेशी दहशतवाद्यांचा समावेश असलेल्या लष्करच्या कटाचा सूत्रधार मानला जातो. दोघांचाही जागीच मृत्यू झाला. भारताने लक्ष्य केलेल्या दहशतवादी अड्डयांमध्ये जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय देखील समाविष्ट आहे. तसेच लष्कर-ए-तैयबा आणि हिजबुल मुजाहिदीनचे तळही उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.
या कारवाईत सर्वात मोठा हल्ला बहावलपूरमध्ये करण्यात आला, जो आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे १०० किमी आत आहे आणि जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय आहे. आता ते उडवले गेले आहे. ऑपरेशन सिंदूर गुप्तचर संस्था आणि लष्कराच्या विशेष पथकांनी संयुक्तपणे राबवले. या कारवाईकडे भारताचे दहशतवादाविरुद्धचे कठोर धोरण म्हणून पाहिले जात आहे.
तसेच भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला संदेश दिला आहे की ते आपल्या सार्वभौमत्वाशी आणि आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड करणार नाही. यामुळे या हल्ल्यात मरण पावलेल्या अनेकांच्या कुटूंबाला न्याय मिळाल्याची भावना निर्माण झाली आहे. या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.