‘छत्रपती’च्या साखर उताऱ्यात वाढ, योग्य नियोजन असल्याने शेतकरी समाधानी, बाजारभावही चांगला मिळणार…

भवानीनगर : येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या साखरेच्या उताऱ्यामध्ये (रिकव्हरी) झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. यामुळे येणाऱ्या काळात जास्तीचा बाजारभाव मिळण्यास मदत होणार आहे. सध्या साखरेचा उतारा १०.०२ झाला आहे. कारखान्याच्या गळीत हंगामाला एक नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे.

तेव्हापासून चेअरमन पृथ्वीराज जाचक, सर्व संचालक मंडळ, कामगार आणि शेतकरी देखील कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सध्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना क्षमतेपेक्षा जास्त गाळप करीत आहे. कारखान्याच्या दोन्ही युनिटची क्षमता दररोज ६५०० टन आहे.

यामध्ये एका दिवसामध्ये ७९०९ ऊस टन गाळप झाले असून कारखान्याने १२ दिवसांमध्ये ७२ हजारटन ऊस गाळपाचा टप्पा ओलांडला आहे. यामुळे असाच प्रवास सुरू राहीला तर येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर गाळप करून कारखाना मोठी आर्थिक उलाढाल करून याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

कारखाना लवकर प्रतिदिन आठ हजार टनापेक्षा जास्त क्षमतेने गाळप करणार असल्याचा विश्वास संचालक मंडळाने व्यक्त केला. सध्या संचालक मंडळाने ऊस तोडणीचे नियोजन व्यवस्थित केले आहे. कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक व उपाध्यक्ष कैलास गावडे यांनी सांगितले की, संचालक मंडळाने चालू गळीत हंगामामध्ये १२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.
त्यादृष्टीने तयारी केली असून सभासदांनी आपल्याच कारखान्याला ऊस घालण्याचे आवाहन केले आहे. काही वर्षांपूर्वी प्रगतीपथावर असलेला छत्रपती कारखाना गेल्या 10 वर्षांत मोठ्या अडचणीत आला आहे. आता सूत्रे पृथ्वीराज जाचक यांच्याकडे आल्याने परिस्थिती बदलत आहे. यामुळे सभासद समाधानी आहेत.
