पाकिस्तानमध्ये हाहाकार झेलमच्या रौद्र पाण्याने उडाली खळबळ, pok मध्ये आला पूर..

नवी दिल्ली : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. यामुळे अनेकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. यानंतर, भारत सरकारने कारवाई करत सिंधू पाणी करार रद्द केला आणि पाकिस्तानी नागरिकांना दिलेले व्हिसा देखील रद्द केले, इतकेच नाही तर त्यांनी पाकिस्तानसाठी अटारी बॉर्डरचे दरवाजे देखील बंद केले आहे.
तेव्हापासून पाकिस्तानचे धाबे दणाणले असून त्यांना आता भविष्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाईची भीती वाटत आहे. दरम्यान, शनिवारी (26 एप्रिल) झेलम नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) पूर आला आहे. पाकिस्तानी मिडियाने आरोप केला आहे की, भारताने अचानक झेलम नदीमध्ये पाणी सोडल्याने ही पूरजन्य परिस्थिती उद्भवली आहे.
पाकिस्तानात उडाला गोंधळ..
अचानक आलेल्या पुरामुळे पीओके राजधानी मुझफ्फराबाद आणि चकोटी येथे स्थानिक अधिकाऱ्यांना लाऊडस्पीकरद्वारे इशारा द्यावा लागला. पाण्याची पातळी झपाट्याने वाढल्याने लोकांना जागा रिकामी करावी लागली. मुझफ्फराबादमधील एका जिल्हा सरकारी अधिकाऱ्याने संक्षिप्त निवेदन जारी करून नागरिकांना झेलम नदीच्या जवळील ठिकाणांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला.
दरम्यान, भारताने कोणतीही पूर्वसूचना न देता उरी धरणातून झेलम नदीत नेहमीपेक्षा पाणी सोडले, ज्यामुळे 1960 च्या सिंधू जल कराराचे उल्लंघन झाले आहे, असा आरोप पाकिस्तानकडून करण्यात आला आहे.
झेलम नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्याने मुजफ्फराबाद आणि आसपासच्या भागातील रहिवाशांना मोठा झटका बसला आहे. ज्यामुळे तेथे आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सिंधू जल कराराच्या स्थगितीसंदर्भात आपल्या निवासस्थानी एक बैठक घेतली. या बैठकीत अमित शहा आणि जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांच्यात सुमारे ४५ मिनिटे गंभीर चर्चा झाली, ज्यामध्ये पाकिस्तानकडे जाणारे पाणी रोखण्याच्या मार्गांवर विचारविनिमय करण्यात आला.
या बैठकीत अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन अशा तीन प्रमुख पर्यायांवर विचार केला गेला. पाकिस्तानकडे एक थेंबही पाणी जाऊ नये असा सरकारचा ठाम निर्धार आहे. बैठकीनंतर निर्णय घेण्यात आला की पाणी रोखण्यासाठी प्रत्येक शक्य त्या उपायांवर त्वरित काम सुरू करण्यात येईल. अधिकाऱ्यांना याबाबत तातडीने पावले उचलण्याचे आदेश देण्यात आले आहेत.