ऊसतोड कामगारांसाठी महत्वाची बातमी! राज्य सरकार हा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

बीड : गुरुवारी बीडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ऊसतोड कामगारांच्या सानुग्रह अनुदानात दुप्पट वाढ करण्याचा विचार सुरू असल्याचे स्पष्ट केले.

यामुळे जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांसाठी एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यात ऊसतोड करताना मृत्यू झाल्यास संबंधित कामगाराच्या वारसांना सध्या ५ लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान दिले जाते.
हेच अनुदान वाढवून १० लाख रुपये करण्याच्या प्रस्तावावर सध्या गंभीरपणे विचार सुरू आहे. तसेच, ऊसतोड कामगार एखाद्या अपघातात गंभीर अपंगत्वास सामोरे गेला, तर त्याला मिळणारी मदत देखील 2.5 लाखांवरून वाढवून 5 लाख रुपये करण्याचा प्रस्ताव सरकारपुढे आहे.

ही माहिती बीड येथे “मिशन साथी” या योजनेच्या शुभारंभप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात देण्यात आली. जिल्हा परिषद आणि सामाजिक न्याय विभागाच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात ‘मिशन साथी’ योजनेअंतर्गत आरोग्य साथींना प्रातिनिधिक स्वरूपात प्रथमोपचार किट वितरित करण्यात आले.

अजित पवार यांनी ऊसतोड कामगारांच्या कष्टांचे कौतुक करताना सांगितले की, राज्यातील साखर उद्योगाच्या गाळप प्रक्रियेत या कामगारांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांच्या मेहनतीमुळेच साखर कारखान्यांचे नियोजन सुरळीत पार पडते आणि राज्याची अर्थव्यवस्था गतिमान राहते. त्यांनी या कामगारांसाठी अधिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही दिले.