दुधात भेसळ केली तर लागणार मोक्का!! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली दूध संस्थांची झोप उडवणारी घोषणा…


पुणे : राज्यात दूध आणि संबंधित अन्नपदार्थांमध्ये होत असलेल्या भेसळीच्या घटनांवर कडक पावले उचलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच भाजप आमदार विक्रम सातपुते यांनी अधिवेशन काळात बनावट पनीरचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर राज्य सरकार ॲक्शन मोडवर आले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत काल एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेसळ करणाऱ्यांवर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करण्यासाठी कायद्यात बदल करण्याची घोषणा केली आहे. विधान भवनात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी विविध सूचना आणि निर्णयांची माहिती दिली आहे.

दुधात भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना या बैठकीत अजित पवारांनी दिल्या आहेत. दूध आणि तत्सम अन्नपदार्थात होणारी भेसळ ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण होतो. हे खपवून घेतले जाणार नाही. दूध आणि तत्सम अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कडक कारवाई करण्यासाठी सध्याच्या कायद्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील. त्यासंबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा, असे निर्देश अजित पवार यांनी दिले आहेत.

ॲनालॉग चीज हा पदार्थ राज्यात अनेक ठिकाणी ॲनालॉग पनीर या नावाने विक्री होत असल्याबाबत तसेच सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील भोसे येथे उघडकीस आलेल्या दूध भेसळीसंदर्भात विधानसभेत लक्षवेधी सूचनेवर झालेल्या चर्चेच्या वेळी दिलेल्या आश्वासनानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील समिती कक्षात मंगळवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

“दुधातील भेसळ तपासण्यासाठी तातडीने प्रत्येक विभागात एक प्रयोगशाळा सुरू करावी, पनीरमध्ये ॲनालॉग चीज असल्यास त्यासंबंधीची माहिती दुकानात दर्शनी भागात लावण्यासंदर्भात सूचना द्याव्यात. दूध भेसळीसंदर्भात जनजागृती करण्यात यावी, भेसळी संदर्भात जनतेला तक्रारी नोंदवण्यासाठी टोल फ्री क्रमांक योग्य प्रकारे कार्यान्वित करावा, पोर्टल विकसित करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.

दुधातील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाला अत्याधुनिक तंत्रज्ञान व यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये आणखी निधी देण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. अन्न व औषध प्रशासन विभागातील अपुऱ्या मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी डेअरी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांची सेवा घेण्यात यावी, त्यांना प्रशिक्षण देण्यात यावे असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

दरम्यान, सोलापूर दूधभेसळ प्रकरणातील आरोपी कोणीही, कोणत्याही पक्षाचे व कितीही मोठे असतील तरी त्यांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) यांना दिल्या आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!