महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा; भारतीय हवामान विभागकडून ‘या’ जिल्ह्यांत अलर्ट…

पुणे : राज्यात आता उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या असून वाढत्या तापमानामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या भीषण परिस्थितीची दखल घेत भारतीय हवामान विभागने राज्याच्या विविध भागांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

दुपारच्या वेळेत घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. राज्याच्या काही भागांमध्ये उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. विशेषतः अकोला आणि अमरावती या शहरांमध्ये तापमानाने चक्क ४६ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे.
या वाढत्या उष्म्यामुळे हवामान खात्याने अमरावती, अकोला तसेच वर्धा या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. याव्यतिरिक्त, इतरही अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४४ अंशांच्या पार गेले असून, नागपूर बुलढाणा आणि चंद्रपूर या ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आला आहे.

या भीषण उन्हामुळे नागरिकांना उष्माघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कडक उन्हात, विशेषतः दुपारी १२ ते ४ या वेळेत अत्यंत निकडीचे काम असल्याशिवाय घराबाहेर जाणे टाळावे, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. वाढत्या उष्म्यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ नये म्हणून प्रत्येकाने स्वतःची योग्य ती काळजी घेणे सध्या खूप गरजेचे बनले आहे.

विदर्भाप्रमाणेच कोकणातील रायगड जिल्ह्यातही उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. एरवी २६ ते २७ अंश सेल्सिअसच्या आसपास असणारे येथील तापमान अचानक वाढून थेट ३८ अंशांवर जाऊन पोहोचले आहे.
तापमानातील या अनपेक्षित वाढीमुळे येथेही हवामान खात्याकडून आजच्या दिवसासाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. दुसरीकडे, जळगाव जिल्ह्यातही उन्हाचा चटका चांगलाच जाणवत असून पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव तालुक्यांमध्ये पाऱ्याने ४३ अंशांची पातळी गाठली आहे.