‘५० खोके, एकदम ओके’ बोलणे उध्दव गटाला महाग! हाय कोर्टाने दिले समन्स…!

मुंबई : शिवसेनेतील बंडखोरी उफाळून आल्यानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप घडला होता. यानंतर राज्यात भाजपने एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी सत्ता स्थापन केली. मात्र ,उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींकडून बंडखोरीसाठी शिंदे गटातील आमदारांना ५० कोटी घेतल्याचा गंभीर आरोप देखील करण्यात येत आहे.
यानंतर सातत्यानं शिंदे गटातील आमदारांना डिवचण्यासाठी ‘पन्नास खोके, एकदम ओक्के’ अशा घोषणाही ठाकरे गटाकडून देण्यात आल्या होत्या. ठाकरे गटाने दिलेल्या या घोषणेमुळे आता त्यांच्याच अडचणी वाढल्या आहेत. हायकोर्टाने या प्रकरणी त्यांना सुनावले आहे.
‘५० खोके, एकदम ओके’ हे शिवसेनेच्या आमदारांविरोधात केलेले वक्तव्य तात्काळ सोशल मीडियातून काढून टाकावे, असे आदेश दिल्ली हायकोर्टाने ठाकरे गटाला दिले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी २००० कोटी देऊन निवडणूक आयोगाकडून चिन्ह खरेदी केले. ५० कोटी देऊन आमदार-खासदारांना विकत घेतले. ‘…शिवसेनेतून घाण निघाली आहे…’ आणि ‘५० खोके, एकदम ओके’ अशा अनेक विधानांवर कोर्टाने आक्षेप नोंदवला आहे आणि ते सोशल मीडियातून हटवण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणी शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी मानहानीचा खटला दाखल केला होता. आता या प्रकरणामध्येच दिल्ली उच्च न्यायालयाकडून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना समन्स बजावले आहे. संजय राऊत यांनाही या खटल्यात समन्स बजावले असून १७ एप्रिल रोजी पुढची सुनावणी होणार आहे.
मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक आमदार-खासदार पक्षातून वेगळे झाल्यानंतर त्यांच्यावर अनेक आरोप झाले. शिंदेंनी आमदार-खासदार खरेदी केल्याचे विरोधक आणि ठाकरे गटाच्या नेत्यांकडून बोलले जाऊ लागले.
यानंतर अधिवेशनात किंवा इतर अनेक सार्वजनिक ठिकाणी, सभांमध्ये सोशल मीडियावर संजय राऊत, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाच्या नेत्यांनी शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या नेत्यांवर टीका केली. ‘५० खोके, एकदम ओके’ ही त्यातली एक प्रमुख घोषणा होती. तसेच अनेकदा शिंदे गटावर टीका करताना ठाकरे गटाची जीभ घसरल्याचेही दिसून आले होते.