शिव शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा स्मरण करून सर्वांनी पुढे गेले पाहिजे – उपमुख्यमंत्री अजित पवार


पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श व कर्तुत्वाची सर्वांनी आठवण ठेवून छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांची विचारधारा स्मरण करून सर्वांनी पुढे गेले पाहिजे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५२ व्या श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त जिल्हा परिषद येथे आयोजित कार्यक्रमात श्री पवार यांच्या हस्ते ‘शिवस्वराज्य’ गुढीचे पूजन करून गुढी उभारण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्र विभागीय आयुक्त कविता द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक शालिनी कडू, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचार धारा सर्व जातीधर्माला न्याय देणारी असून सर्वांमध्ये जातीय सलोखा निर्माण करणारी आहे. ही विचारधारा राज्यातील, देशातील सर्वांमध्ये एकोपा ठेवणारी आहे या विचारांशिवाय आपण राज्य, देश पुढे नेऊ शकत नाही. या थोर महापुरुषांनी जी शिकवण आपल्या सर्वांना दिली आहे तिचे सर्वांनी सतत स्मरण करून पुढील वाटचाल केली पाहिजे, असेही श्री. पवार म्हणाले.

शिवराज्याभिषेकच्या दिवशी त्याकाळी घराघरांवर गुढ्या उभारण्यात आल्या होत्या. त्यामुळे आज आनंदाचे प्रतीक म्हणून सर्वत्र गुढी उभारली जाते. शिवराज्याभिषेकाच्या दिवशी महाराष्ट्रात, देशात पहिल्यांदाच रयतेचे राज्य सुरू झाले, ‘शिवस्वराज्य’ स्थापन झाले. मराठी साम्राज्याला पहिले राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने मिळाले. मराठी राज्य स्थापना झाल्याचा हा दिवस सर्वांसाठी अभिमानाचा, स्वाभिमानाचा,आनंदाचा दिवस आहे. ६ जून हा ‘शिवस्वराज्य दिवस ‘म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी राज्यात सर्वत्र होत आहे. असे त्यांनी सांगितले.

सन २०१९-२० या काळात कोरोना सारखे संकट, आजार अचानक जगात व देशात आले त्या काळात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आपले जीवाभावाचे सहकारी आपल्याला सोडून गेले या संकटात जिल्हा परिषद मधील व त्यांच्याशी संबंधित असलेल्या ४२ अधिकारी,कर्मचाऱ्यांना स्वतःचा जीव गमवावा लागला या सर्वांची आठवण राहावी म्हणून,या ४२ सहकाऱ्यांची नावे असलेल्या फलकाचे
उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

कार्यक्रमात सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास उपमुख्यमंत्री पवार यांनी पुष्पहार अर्पण करुन वंदन केले. त्यानंतर यांच्या हस्ते जिल्हा परिषदेमधील कोविड योद्धा स्मारकाचे व डिजिटल प्रणालीचे उद्घाटन झाले. कार्यक्रमानंतर जिल्हा परिषदेमध्ये सुरु असलेल्या हिरकणी कक्षाची उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी पाहणी केली. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेतील विविध विभागाचे विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!