धनंजय मुंडेंच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या पत्नीचं निधन, चौकशीची मागणी, भयंकर माहिती आली समोर..

बीड : माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आणि वेंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हीसेसचे डायरेक्टर राजेंद्र घनवट यांच्या पत्नी मनाली घनवट यांचे पुण्यात आकस्मिक निधन झाले. या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या ट्वीटमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मनाली घनवट यांच्या पार्थिवावर आज पुण्यातील औंध येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. या प्रकरणात कोणतीही गडबड नसल्याची खातरजमा करण्यासाठी सखोल तपास व्हावा, अशी मागणी अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा केली आहे. यामुळे याची चर्चा सुरु आहे.
ज्युपिटर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत दमानिया यांनी काही प्रश्न उपस्थित केला आहेत. दमानिया यांनी मनाली घनवट यांचा मृत्यू आत्महत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे. हा नैसर्गिक मृत्यू असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न सुरु आहे, असा थेट आरोप केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळच्या व्यक्तीच्या पत्नीचा मृत्यू कारणांशिवाय झाला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. दमानिया यांनी म्हटले आहे की, व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हीसेस या कंपनीत घनवट आणि राजश्री धनंजय मुंडे हे दोघेही डायरेक्टर आहेत.
त्यांनी 11 शेतकऱ्यांना छळून त्यांच्या 20 कोटींच्या जमिनी केवळ 8 लाख रुपयांत खरेदी केल्याचा आरोप केला गेला आहे. राजेंद्र घनवट यांच्यावर शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी आधीही केले होते. या प्रकरणी अंजली दमानिया यांनी महसूल मंत्र्याकडे तक्रार दाखल केली आहे.
पर्दाफाश होणारच, कितीही मानहानीची केस दाखल केली तरी मी मागे हटणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच गृहमंत्र्यांकडेही सक्त कारवाईची मागणी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत धक्कादायक माहिती समोर येणार का? हे लवकरच समजेल.