लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी करण्यासाठी उरले अवघे काही दिवस, अन्यथा बंद होणार योजनेचा हप्ता…

पुणे : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

मात्र आता या योजनेबाबत एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. सरकारने या योजनेसाठी KYC प्रक्रिया अनिवार्य केली असून, ती पूर्ण न केल्यास तुमचा पुढचा हप्ता बंद होऊ शकतो.

ही योजना राज्यातील अडीच लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. तसेच ज्या कुटुंबांच्या नावावर कोणतेही चारचाकी वाहन नाही, अशा लाभार्थींनाच या योजनेचा लाभ घेता येतो. मात्र सरकारकडे आलेल्या अहवालानुसार, अनेक अपात्र महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झालं आहे.

या योजनेच्या सुरुवातीला सरकारने काही ठराविक पात्रता निकष ठेवले होते. परंतु प्रत्यक्षात पाहता, अनेक अशा महिलांनी हप्ता घेतला ज्यांना सरकारी नोकरी आहे किंवा ज्यांचं उत्पन्न ठरवलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे आता सरकारने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींची तपासणी सुरू केली आहे.
या प्रक्रियेअंतर्गत सरकारने सर्व लाभार्थी महिलांना ई-KYC करणे बंधनकारक केले आहे. जर लाभार्थी महिलांनी निर्धारित वेळेत KYC पूर्ण केली नाही, तर त्यांच्या खात्यात येणारा महिन्याचा रु १५०० रुपयांचा हप्ता थांबवला जाईल.
सरकारने सध्या KYC प्रक्रियेसाठी १८ नोव्हेंबर २०२५ ही अंतिम मुदत जाहीर केली आहे. म्हणजेच आजपासून फक्त आठ दिवसांचा कालावधी उरला आहे. या काळात पात्र लाभार्थींनी आपली KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर पुढील महिन्यापासून त्यांचा हप्ता थांबवला जाईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, प्रशासनाने स्पष्ट केलं आहे की, या वेळेस मुदतवाढ मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे सर्व महिलांनी विलंब न करता तात्काळ जवळच्या अधिकृत केंद्रात किंवा ऑनलाइन पोर्टलवरून KYC प्रक्रिया पूर्ण करावी, असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.
सरकारच्या तपासणीत आढळून आलं आहे की, काही महिलांनी खोट्या माहितीच्या आधारे या योजनेचा लाभ घेतला आहे. विशेष म्हणजे काही लाभार्थी या योजनेसाठी पात्र नसतानाही हप्ता घेत आहेत. त्यामुळे अशा अपात्र लाभार्थ्यांची नावं योजनेतून वगळण्याचं काम सध्या जलदगतीने सुरू आहे.
राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेल्या निर्देशांनुसार, फक्त पात्र महिलांचाच हप्ता सुरू राहील, तर अपात्र लाभार्थींना पुढील महिन्यापासून रक्कम मिळणार नाही.
