पुणे जिल्ह्यात शरद पवारांना धक्का! दौंडचे माजी आमदार रमेश थोरात अजित पवार यांच्या गटात…

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत सरकारमध्ये सामील होत सर्वांना मोठा धक्का दिला. त्यांना पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षाच्या मातब्बर नेत्यांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असून, दोन्ही गटांनी पक्षावर दावा सांगितला आहे. त्यासाठी दोन्ही गटांनी आज आमदार, खासदार, प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्षांच्या बैठका मुंबईत बोलावल्या.
राज्याचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर दौंडचे माजी आमदार रमेश थोरात, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष वैशाली नागवडे यांच्या एका गटाने अजित पवार यांच्या सभेला उपस्थित राहून थेट अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत सामील असल्याचे संकेत दिले आहेत.
दौंड राष्ट्रवादीचा मोठा गट अजित पवार यांच्याकडे गेल्याने हा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड करीत भारतीय जनता पक्ष व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना यांच्यात सत्तेत सहभागी झाल्याने राज्यातील राजकीय भूकंप घडवून आणला.
दरम्यान, अजित पवार यांच्या बंडानंतर दौंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते आणि कार्यकर्ते संभ्रमात होते. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जायचे की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात जाऊन सत्तेत सहभागी होयचे याबाबत ते कात्रीत सापडले होते.
मात्र आता दौंडचे माजी आमदार, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष रमेश थोरात, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष वैशाली नागवडे, दौंड शुगरचे संचालक आणि माजी जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांच्यासह तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेला उपस्थित राहून थेट अजित पवार यांच्यासोबत जात असल्याचे एक प्रकारे स्पष्ट संकेत दिले आहेत.
त्यामुळे दौंड तालुक्यात राष्ट्रवादीला विशेषतः बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच खासदार सुप्रिया सुळे या दौंड तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या.
त्यांच्यासोबत माजी आमदार रमेश थोरात यांनी तालुक्यातील विविध विकास कामे व तसेच प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करून त्या मार्गी लावण्याचे आश्वासन खासदार सुळे यांनी दिले होते.