‘या’ दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देणार जनतेला मोठं गिफ्ट, जाणून घ्या..

मुंबई : महाराष्ट्राच्या दळणवळणात क्रांती घडवणारा समृद्धी महामार्ग आता संपूर्ण क्षमतेने लोकसेवेसाठी खुला होत आहे. येत्या १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. यामुळे मुंबई आणि नाशिक यामधील अंतर केवळ तीन तासांत पार करता येणार आहे.
समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमण हा शेवटचा ७६ किमी लांबीचा टप्पा पूर्ण झाला असून, त्यामुळे ७०१ किमीचा संपूर्ण मार्ग आता तयार झाला आहे. या प्रकल्पाच्या याआधीच्या टप्प्यांमध्ये ६२५ किमीचा भाग आधीच वाहतुकीसाठी सुरू झाला होता, ज्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. आता उर्वरित टप्प्याचे कामही पूर्ण झाल्याने, नागपूर ते मुंबई हा संपूर्ण प्रवास केवळ ८ तासांमध्ये शक्य होणार आहे.
दरम्यान, सुमारे ५५ हजार कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या या महामार्गाच्या कामासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि एमएमआरडीएने एकत्रितपणे काम केले आहे. शेवटच्या टप्प्यातील कामाला विलंब झाल्यामुळे ते मार्चअखेर पूर्ण होण्याऐवजी आता मेच्या पहिल्या दिवशीच सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे.
समृद्धी महामार्गाचे अधिकृत नाव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असे आहे. या महामार्गाच्या माध्यमातून राज्यातील १० मुख्य जिल्ह्यांना थेट जोडण्यात आले आहे, तर आणखी १४ जिल्हे अप्रत्यक्षरित्या या मार्गाशी संलग्न आहेत. यामुळे केवळ प्रवासाचाच वेळ कमी झाला नाही, तर राज्यात आर्थिक गतीही वाढण्यास मदत होणार आहे.