अखेर मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी होणार मंत्रिमंडळ विस्तार; संजय शिरसाट, बच्चू कडूंचा समावेश?
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याचे शिंदे- फडणवीस सरकारकडून सांगण्यात येत होते. ज्याची आता तारीखही समोर आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे रखडलेल्या मंत्रि मंडळाचा विस्तार हा २३ किंवा २४ मे ला घेण्याची चर्चा आहे.
तसेच या मंत्रिमंडळ विस्तारात भरत गोगवले( जलसंधारण मंत्री), संजय शिरसाठ (परिवहन किंवा समाज कल्याण) बच्चू कडू (दिव्यांग मंत्री)प्रताप सरनाईक, सदा सरवणकर, यामिनी जाधव, अनिल बाबर, चिमन आबा पाटील या आमदारांची वर्णी लागण्याचीही चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे अखेर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाल्याचे बोलले जात आहे.
शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील निकाल सर्वोच्च न्यायालयानं राखून ठेवला होता. गेल्या आठवड्यात न्यायालयानं अपात्रेसंदर्भात निर्णय दिला आहे. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा असं न्यायालयाने म्हटलं आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे.