रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत मोठा निर्णय? शिंदे गटाला मोठा धक्का, नेमकं काय घडलं?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून नाशिकच्या आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत वाद सुरु आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय गिरीश महाजन यांची नाशिकच्या तसेच रायगडच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली होती. मात्र, नाशिकसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटचे सहकारी दादा भूसे आणि रायगडसाठी शिंदे समर्थक भरत गोगावले यांनीही इच्छाशक्ती दाखवली होती.
यामुळे राजकीय गोंधळ निर्माण झाला होता. असे असताना रायगडमध्ये गोगावले यांच्या समर्थकांनी आंदोलन छेडल्याने या दोन्ही जिल्ह्यांतील नियुक्तीला काही काळ स्थगिती देण्यात आली. आता मात्र 1 मे रोजी होणाऱ्या ध्वजवंदनासाठी महाजन व तटकरे यांची अधिकृत नियुक्ती झाल्याने, पुन्हा एकदा या पदांवर त्यांची वर्णी लागणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरम्यान, रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा पेच अजूनही सुटलेला नाही. आता महाराष्ट्र शासनाने 28 एप्रिल 2025 रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, येत्या 1 मे महाराष्ट्र दिनी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे ध्वजवंदन करणार आहेत. यामुळे चर्चा सुरु आहे.
तसेच नाशिकमध्ये गिरीश महाजन ध्वज फडकावणार असल्याने अदिती तटकरे यांना रायगडच्या पालकमंत्रीपदाची संधी मिळणार का, यावर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. याबाबत रायगड जिल्ह्यातील ध्वजवंदनाचा मान अदिती तटकरे यांना दिल्यानंतर भरत गोगावले म्हणाले की, फक्त झेंडावंदनाचा मान मिळाला म्हणून पालकमंत्रीपद मिळाले असे होत नाही.
मी रायगडचा मावळा आहे, माझी तलवार अजूनही म्यान झालेली नाही, असे ते म्हणाले. गोगावले यांच्या या प्रतिक्रियेमुळे रायगडच्या पालकमंत्रीपदावर अजूनही संघर्ष शिगेला पोहोचल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा अंतिम निर्णय काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत निर्णय दिल्लीत होण्याची शक्यता आहे.