सिंहगडावर मोठी कारवाई! ५ दिवसांत घडलं असं काही, जे इतिहासात कधीच नाही, तुम्हीही कराल कौतुक…

पुणे : पुण्यातील ऐतिहासिक सिंहगड किल्ल्याचे पावित्र्य जपण्यासाठी आणि किल्ल्यावरील अतिक्रमणे हटवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. अवघ्या पाच दिवसांच्या आत गडावरील सुमारे २० हजार स्क्वेअर फुटांवरील अनधिकृत बांधकामे भुईसपाट करण्यात आली आहेत.
अवघ्या पाच दिवसांत सुमारे २०,००० चौरस फुटांवरील बेकायदेशीर आरसीसी व दगडी बांधकामे हटवून किल्ल्याचे ऐतिहासिक पावित्र्य जपण्यात यश आले आहे. ‘गडकिल्ले अतिक्रमणमुक्ती’च्या राज्यव्यापी मोहिमेअंतर्गत ही ही धडक कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने व पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या मोहीमेमुळे सिंहगडाचा मूळ इतिहास आणि सौंदर्य पुन्हा उजळून निघाले आहे. विशेष म्हणजे, सिंहगडाच्या इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमणविरोधी कारवाई यापूर्वी कधीच झाली नव्हती.
ही कारवाई सुरू असताना पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सिंहगड किल्ला काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात आला होता. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीकडे जाणाऱ्या मार्गावर उभारण्यात आलेल्या अनधिकृत इमारती विशेषतः लक्ष्यात घेऊन पाडण्यात आल्या. कामादरम्यान कोणतीही ऐतिहासिक वास्तू बाधित होऊ नये, याची विशेष काळजी घेण्यात आली.
राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार ३१ मेच्या आत गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवण्याचे आदेश दिले होते. याच पार्श्वभूमीवर, गुरुवारपासून सिंहगडावर गोपनीयतेत ही कारवाई सुरू करण्यात आली. प्रशासन, पोलीस, पुरातत्व व वन विभागाच्या समन्वयाने ही मोहीम राबवण्यात आली.
दरम्यान, या कारवाईनंतर सिंहगडावर पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी प्रशासनाने संबंधित विभागांना कठोर निर्देश दिले आहेत. भविष्यात कोणतीही अनधिकृत रचना उभारली गेल्यास तातडीने ती हटवली जाईल, अशी खबरदारी घेण्यात आली आहे.