काळजी घ्या! राज्यात उष्माघाताने घेतला आणखी एक बळी, घटनेने हळहळ…

बुलढाणा : राज्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. विदर्भात तर उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४०अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे.
चिखली एसटी डेपोमध्ये कार्यरत असलेल्या एका ३० वर्षीय वाहकाचा संशयित उष्माघाताने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे परिवहन विभागात आणि स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
संजय भगवान मोरे (वय. ३०) असे मृतक वाहकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहिती नुसार संजय भगवान मोरे रविवारी बुऱ्हाणपूर येथून बस घेऊन परतले होते. ड्युटीवर पुन्हा जाण्याच्या आधी त्यांना अचानक त्रास होऊ लागला. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर मृत घोषित केले. उष्माघातामुळेच त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, वाढत्या उष्णतेसोबतच राज्यातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाईही जाणवू लागली आहे. नदी-नाल्यांचा पाणीसाठा अटल्यानं अनेक गावांमध्ये टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुरेसे पाणी पिणे, उन्हात गरज नसल्यास बाहेर न पडणे आणि उष्णतेपासून बचाव करण्यासाठी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.