बावनकुळेंचा फोन अन् हाकेंचा मोठा निर्णय; ओबीसी एल्गार मोर्चा तात्पुरता स्थगित, मुख्यमंत्र्यांसोबत होणार बैठक

मुंबई : ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेने निघालेला ओबीसी एल्गार मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्ष्मण हाके यांच्याशी फोनवरून संपर्क साधत मुंबईत चर्चेसाठी येण्याचे आवाहन केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आहे.

या आवाहनानंतर लक्ष्मण हाके यांनी मोर्चा काही काळासाठी थांबवण्याचा निर्णय घेतला. कालपासून मुंबईच्या दिशेने हा मोर्चा सुरू होता. ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी हा एल्गार मोर्चा काढण्यात आला होता.


दरम्यान, मोर्चा स्थगित करण्यात आला असला तरी ओबीसी समाजाच्या मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनाचा लढा सुरूच राहणार असल्याचे ओबीसी कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. हा संघर्ष कोणत्याही एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून, ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी असल्याची भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली.
आता मुंबईत मुख्यमंत्री आणि ओबीसी नेत्यांमध्ये होणाऱ्या चर्चेतून नेमका काय तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.