Assembly Elections : मनोज जरांगे आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात नेमकं काय ठरलं? अंतरवली सराटीत घडामोडींना वेग..

Assembly Elections : विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. अशातच घडामोडींना वेग आला आहे. महायुती, महाविकास आघाडी, इतर छोट्या मोठ्या पक्षांच्या आघाड्या, स्वबळावर लढणारे पक्ष आपल्या उमेदवार याद्या जाहीर करत आहेत, अशातच गाठीभेटींना वेग आला आहे.
तसेच अनेकजण मध्यरात्री आणि पहाटेही गुपचूप भेटण्यासाठी धडपड करत आहेत, ज्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या संदर्भात संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी देखील जरांगे यांची भेट घेतली आहे. या बैठकीत कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी ठरल्या, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
माजी मंत्री बदामराव पंडित यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, संभाजी ब्रिगेड आणि मनोज जरांगे यांची भूमिका एकसारखी आहे. मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश आणि ओबीसींचे संरक्षण यासंदर्भात दोघांचीही ध्येयं समान आहेत. Assembly Elections
दरम्यान, यामुळे दोन्ही गटांना एकत्र येण्याची संधी आहे. पंडित यांनी सांगितले की, राजकीय पक्षांसह समविचारी लोकांनी एकत्र येऊन आपला झेंडा आणि अजेंडा पुढे आणण्याची गरज आहे. या संदर्भात पुढील निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
आता या दोन गटांमध्ये समन्वय चांगला आहे, परंतु या लोकशाही महोत्सवात स्वतंत्रपणे भाग घेण्याची तयारी संभाजी ब्रिगेडने दर्शवली आहे. जरांगे यांनाही तसंच सूचित केले आहे. मात्र, उमेदवार ठरवण्यासाठी एकत्र चर्चा करणार असल्याचं पंडित यांनी स्पष्ट केले आहे.
समाजाचे प्रश्न मांडणाऱ्या योग्य उमेदवारांची निवड महत्त्वाची आहे, याबद्दल दोन्ही गट एकमत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये दोन्ही गटांच्या सहकार्यातून संभाव्य उमेदवार ठरवण्यावर लक्ष केंद्रीत केले जाईल.