अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी अजितदादांची मोठी घोषणा, ‘ही’ अट आता केली रद्द…

पुणे : मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी मोठी अतिवृष्टी झाली आहे. राज्यात सध्या सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून तातडीने मदत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी केली. त्याचबरोबर मंत्री पंकजा मुंडे यांनी जालना जिल्ह्यातील बाधित गावांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.
धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील पाहणीदरम्यान अजित पवारांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. करमाळा तालुक्यातील कोरटी येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केले की निधीची कोणतीही चिंता नाही, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.

पंचनाम्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार असून मदतीसाठीची ६५ मिमी पावसाची अट रद्द केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत मिळवताना अडचणी येणार नाहीत.

यावेळी अजित पवारांनी देवगाव, वालवड आणि पारगाव अशा अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती घेतली आणि कांदा तसेच इतर पिकांच्या हानीबद्दल थेट शेतकऱ्यांकडून परिस्थिती जाणून घेतली. शेतकऱ्यांच्या भल्यासाठी जे काही शक्य आहे ते करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
दरम्यान, मंत्री पंकजा मुंडे यांनी परतूर तालुक्यातील गोळेगाव गावाला भेट दिली. गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे गावाला मोठा वेढा बसला होता. यामुळे दोन ते अडीच हजार नागरिकांना मध्यरात्रीच शेजारच्या लोणी गावात स्थलांतर करावे लागले. पंकजा मुंडे यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांची अडचण समजून घेतली आणि नुकसानाची माहिती घेतली आहे.