Accident News : पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांचा भीषण अपघात! ५ वारकऱ्यांचा मृत्यू, ४० जखमी, वारीवर शोककळा…

Accident News : आषाढी एकादशीसाठी आता अवघे काही तास शिल्लक असतानाच मुंबई, पुण्याहूनही मोठ्या संख्येनं भाविकांनी पंढरपूरची वाट धरली आहे. अशाच काही भाविकांवर विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेलं असतानाच वाटेतच काळानं घाला घातला.
आषाढी एकादशीनिमित्त डोंबिवली परिसरातून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या भाविकांच्या बसचा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर भीषण अपघात झाला आहे. रात्री उशिरा हा बस या मार्गावरुन जात असताना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर एका ट्रॅक्टरने बसला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे.
बसमध्ये ५४ भाविकांपैकी ५ भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर ४० भाविकांवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु असून अन्य जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. Accident News
बसमधील सर्व प्रवासी डोंबिवली लोढा या परिसरातील असल्याचे समजते. भाविक काल रात्री बसने आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला निघाले होते. पण वाटेतच आक्रीत घडले आणि भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी मुकले आहेत. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान एक्सप्रेसवेवर ट्रॅक्टरला बंदी असताना सुद्धा ट्रॅक्टर एक्सप्रेसवेवर आला आणि हा दुर्दैवी अपघात घडला. बंदी असताना सुद्धा ट्रॅक्टर आलाच कसा यावरुन पोलीस यंत्रणेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.