अखेर ठरलं! राज्यपाल नियुक्त जागांसाठी सूत्र फिक्स, अशी होणार १२ जागांची वाटणी…

मुंबई : राज्यात २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रश्न प्रलंबित आहे. यामुळे मोठा वाद देखील झाला. आता मात्र सरकार बदलले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या निवडीचा मार्ग मोकळा केल्यानंतर राज्यात राजकीय हालचाली वाढल्या आहेत. यामुळे कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आता या १२ जागांपैकी भारतीय जनता पक्षाला सहा, तर शिवसेनेला (एकनाथ शिंदे गट) तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) तीन जागा मिळणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला तीन आमदारांची लॉटरी लागणार आहे.

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारने दिलेली १२ जणांची नावे रद्द करून नवी यादी राज्यपालांकडे पाठविली होती. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

असे असताना मात्र, सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर २०२२ पासून आमदार नियुक्तीला स्थगिती दिली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयात ११ जुलै २०२३ रोजी झालेल्या सुनावणीत ती बंदी उठविण्यात आली होती.
त्यामुळे राज्यपाल नियुक्त आमदार निवडीचा विषय मोकळा झाला होता. शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामील झाली आहे. त्यात शिंदे-फडणवीस सरकारने आधी पाठविलेल्या यादीत आता बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शिवसेना, भाजपबरेाबरच आता राष्ट्रवादीलाही काही जागा द्याव्या लागणार आहेत. पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर तातडीने हा विषय मार्गी लावण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
नव्या राजकीय फेररचनेनुसार सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाला सहा आमदार मिळणार आहेत. सहकारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी तीन जागा मिळणार आहेत, अशी माहिती समोर येत आहे.