मुंबई-पुणे एक्सप्रेसवे दुपारी ‘या’ वेळेत दोन तास बंद, वाहतुकीत होणार बदल..


पुणे : मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आज २ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे दुपारी १२ ते २ या वेळेत वाहतूक बंद असेल. पुण्याकडून मुंबईला जाणारी वाहतूक दोन तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून लोणावळा परिसरात मुसळधार पाऊस पडतो आहे. रविवारी खंडाळा घाटात दरड कोसळली तसेच महामार्गावरही छोट्या छोट्या दरड कोसळण्याच्या घटना घडल्या. याच दरडी हटविण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती मिळाली आहे.

पुणे मुंबई महामार्गावर रविवारी दोन ठिकाणी दरडी कोसळल्या. मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावरतीच या दरडी कोसळल्या होत्या. त्याचा परिणाम वाहतुकीवर देखील झालेला होता. मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत वाहतूक मंद गतीने सुरू होती.

लोणावळ्याजवळ एक दरड कोसळली आहे तर दुसरी अडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली होती. या ठिकाणची दरड हटविण्यात आलेली आहे. मात्र महामार्गावरील एक लेन अद्यापही बंद आहे. कारण संबंधित लेनवरती अजूनही राडारोडा कायम आहे.

त्यावरून वाहने घसरू शकतात. दुसरी दुर्घटना या ठिकाणी घडू शकते. त्यामुळे ही लेन लेन बंद ठेवण्यात आलेली आहे. त्याच कारणास्तव एमएसआरडीसीने दोन तासांसाठी मुंबईकडे जाणारी वाहतूक रोखण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यादरम्यान दरड हटविण्यात येतील.

दरम्यान, पुण्याहून मुंबईकडे येताना चिवळे पॉइंट लागतो तिथून जुन्या मुंबई पुणे महामार्गाकडे वाहतूक वळविण्यात येईल. याच मार्गावरुन चार चाकी, हलकी मध्यम, अवजड स्वरुपाची वाहने जातील.

१२ ते २ यादरम्यान ही वाहतूक जुन्या महामार्गाकडे वळविण्यात येईल. दरडी हटविण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर मुंबईकडे जाणारी लेन पुन्हा सुरु करण्यात येईल, अशी माहिती एमएसआरडीसीने दिलेली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!